जिल्हा परिषदेकडून “ओटी टेस्ट’ : दहा टॅंकर अयोग्य असल्याचा निष्कर्ष
पुणे – दुष्काळाच्या तीव्रेमुळे ग्रामीण भागात शासनाकडून टॅंकरने पाणीपुुरवठा सुरू आहे. यातून दूषित पाणीपुरवठा होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून काळजी घेतली जात आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी टॅंकरच्या घेतलेल्या “ओटी टेस्ट’मध्ये दहा टॅंकर अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या पाण्यावर प्रक्रिया करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी गुणवत्ता निरीक्षकांनी दिली.
टॅंकरमधून दूषित पाणी पुरवठा होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जलस्रोतांचे शुद्धीकरण, टॅंकरच्या पाण्याचे शुद्धीकरण यावर भर दिला जात आहे. टॅंकरच्या पाण्याची तपासणी करूनच पुरवठा केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दूषित पाणीपुरवठ्यातून नागरिकांना आजारांची लागण होऊ नये, यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने हे काम सध्या सुरू आहे. जिल्ह्यात सध्या बारा तालुक्यांमध्ये 200 पेक्षा अधिक टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवकांवर संबंधित भागातील कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडून नियमीतपणे पाहणी करून जिल्हा परिषदेला अहवाल सादर केला जात आहे. दरम्यान, येत्या काळातही “ओटी टेस्ट’ करूनच पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.