मान्सून कर्नाटक किनारपट्टीवर स्थिरावला
पुणे – मान्सूनने कर्नाटकापर्यंत धडक मारल्यानंतर आता वेध लागले आहेत, ते पाऊस महाराष्ट्रात दाखल होण्याचे. “वायू’ वादळाची तीव्रता कमी झाल्याने मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. दरम्यान, सध्या कोकणात अनेक ठिंकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे.
यंदा मान्सूनची वाटचाल ही अडखळतच सुरू आहे. केरळात आठ दिवस उशिराने दाखल झाल्यानंतर मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाला होता. त्यामुळे तो 13 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होईल, अशी शक्यता होती. पण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या “वायू’ चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासाला ब्रेक लागला होता. मान्सूनसाठी आवश्यक असणारी आर्द्रता वादळाने शोषून घेतल्याने मान्सून लांबला.
हे वादळ संथ झाल्यानंतर आता पुन्हा मान्सूननची वाटचाल सुरू झाली आहे. संपूर्ण केरळचा प्रदेश व्यापल्यानंतर त्याने कर्नाटकाच्या किनारपट्टीवर धडक मारली आहे. सध्या मान्सून कर्नाटक किनारपट्टीवर स्थिरावला असला, तरी कर्नाटकमधील आणखी काही भागात दाखल होण्यासाठी आवश्यक असणारी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर मात्र तो कोकण आणि गोव्यात दाखल होईल. मान्सूनची अशीच प्रगती राहिली, तर येत्या 48 तासांत मान्सून गोवा आणि कोकणात दाखल होईल, अशी शक्यता आहे. दरम्यान रत्नागिरी येथे गेल्या चोवीस तासांत 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर हर्णे, मंडणगड, रोहा,याठिकाणी सुद्धा अधूनमधून पाऊस होत आहे.