बेपत्ता मुलीच्या पित्याला दहा लाख देण्याचे आदेश
मुंबई – बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याचा पोलिसांचा हलगर्जीपणा राज्य सरकारला चांगलाच भोवला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बेपत्ता मुलीच्या पित्याला दहा लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
अल्पवयीन मुलीची हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी ठरवून ठोठावलेल्या फाशी शिक्षेविरोधात आरोपी नाझिर खानने उच्च न्यायालयात दाखल केलेले अपील आणि राज्य सरकारने फाशीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.
संभाजीनगरात राहणाऱ्या वारीस अली यांची अल्पवयीन मुलबी जानेवारी 2012 मध्ये बेपत्ता झाली. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह आढळून आला. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली होती. मात्र, पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्यानेच मुलीची हत्या झाल्याचा ठपका न्यायालयाने ठेवून पोलिसांच्या कार्यपध्दतीवर ताशेरे आढले.
अली याला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच परिसरात असलेल्या जाहिरात कंपनीत काम करणाऱ्या नाझिर खान आणि विनोद मेहेर या दोघांना अटक करून खटला दाखल केला. सत्र न्यायालयाने खान याला फाशीची शिक्षा, तर मेहेर याला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. मात्र या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने तपास झाल्याचा दावा अलीने केला. याची दखल घेत न्यायालयाने राज्य सरकारला मुलीच्या पित्याला दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.