लखनौ – उत्तरप्रदेशने मोदींना पंतप्रधान बनवले पण उत्तरप्रदेशच आता त्यांना या पदावरून घालवणार आहे आणि आज जे सर्व संकेत मिळताहेत ते मोदी पंतप्रधानपनावरून जाणार आहेत याचेच संकेत आहे असे प्रतिपादन करीत बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी मोदींवर तोफ डागली आहे. आपल्या ट्विटरी अकौंटवर त्यांनी ही प्रतिक्रीया नोंदवली आहे. त्यांनी म्हटले आहे की आपल्याला उत्तरप्रदेशच्या जनतेनेच पंतप्रधान बनवले आहे असे मोदी म्हणतात ते खरे आहे. पण मग तुम्ही उत्तरप्रदेशच्या 22 कोटी जनतेचा विश्वासघात का केला असा सवाल त्यांनी केला. या राज्यातील जनता तुम्हाला पंतप्रधान बनवू शकते तर हीच जनता तुम्हाला खालीही खेचू शकते. आणि सर्व संकेत हीच शक्यता दर्शवतात असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की पंतप्रधान मोदी आपल्याच मन की बात ऐकवतात आणि आपण मागास समाजातील आहोत याचा ते आता उल्लेख करू लागले आहेत पण बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष ही आघाडी लोकांच्या मनातील बात ऐकते, त्यांचा सन्मान करते आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते असेही त्यांनी म्हटले आहे.