– हितेंद्र गांधी
जुन्नर – जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागांतील सह्याद्रीच्या रांगेत वसलेल्या निसर्गरम्य दाऱ्या घाट, नाणे घाटात पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे. गेल्या आठवड्यापासून या परिसरात संततधार सुरू असून पर्यटकांना येथील धबधबे आकर्षित करत आहेत. जुन्नरपासून 30 ते 40 किलोमीटर असलेल्या या पर्यटनस्थळांव्यतिरिक्त किल्ले चावंड, कुकडेश्वर, जुन्नर शहराजवळील शिवनेरी, लेण्याद्री, ओझर आदी ठिकाणीही गर्दी होत आहे.
जुन्नरहून आपटाळे येथे गेल्यावर उजवीकडे नाणेघाट मार्ग आहे, तर सरळ गेल्यावर दाऱ्या घाटाकडे रस्ता जातो. दाऱ्या घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट असून, वाहनचालकांनी वाहने सावकाश चालवावीत. दाऱ्या घाट म्हणजे फेसाळणारे शुभ्र धबधबे, दाट धुके आणि स्वर्गीय आनंद. या ठिकाणी तुरळक मनुष्यवस्ती असल्याने निसर्गाने आपले मूळ रूप आबादीत राखले आहे. येथील काही निसर्गप्रेमी ग्रामस्थांचा दाऱ्याघाट मार्गालाही विरोध आहे.जर मुंबईकडे जाणारा हा मार्ग झाला तर येथील वनसंपदा लोप पावेल; शांती नष्ट होईल, अशी भीती त्यांना वाटते.
ऐतिहासिक नाणेघाट म्हणजे सातवाहन काळातील महत्त्वाचा रस्ता. जुन्नर तालुक्यातून मुरबाड तालुक्यातील पळू येथे जाणाऱ्या दगडी पायवाटेचे अवशेष आजही असून, निसर्गप्रेमींसाठी हा आवडीचा ट्रेक आहे. ही पायवाट पावसाळ्यात धोकादायक असल्याने या दिवसात हा ट्रेक न करण्याची सूचना दिल्या जातात. त्याकाळी शुल्क आकारणीसाठी वापरण्यात येणारे भलेमोठे दगडी रांजण ऊन पावसाला तोंड देत अद्यापही इतिहासाची साक्ष देत आहे. सर्वांत अप्रतिम स्पॉट म्हणजे रिव्हर्स वॉटर फॉल या ठिकाणी धबधब्याच्या रूपाने दरीत कोसळणारे पाणी खालून येणाऱ्या हवेने रोखले जाते आणि पुन्हा वर फेकले जाते. हा नजारा पाहण्यासाठी नाणेघाटाच्या थोडे अलीकडून डावीकडे थोडे अंतर जावे लागते.
वाहनचालकांनी वाहने सावकाश चालवावीत
आपटाळे ते नाणेघाट मार्गावर इंटरनेट जोडणीसाठी रस्त्याच्या साईडपट्टी खोदाईचे काम सुरू आहे, तसेच दाऱ्या घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट असून, या दोन्ही ठिकाणी वाहनचालकांनी वाहने सावकाश चालवावीत, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील पर्यटकांसह मुंबईकर मंडळी मोठ्या प्रमाणावर येत असतात. येथे अनेकदा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, अनेकदा मनुष्यहानीही झालेली आहे.
पर्यटकांची हुल्लडबाजी नको
या घाटात पर्यटकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या पर्यटन स्थळी पोलिसांची अधिक कुमक असणे गरजेचे असून, या ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्या अतिउत्साही मद्यपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.