कोपरगाव – अभियंत्यांच्या देखरेखीखाली साठवण तलावातील गाळ काढणार असल्यामुळे नगरपरिषदेची मान्यता घेऊनच युवा नेते आशुतोष काळे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत पोकलेन मशिन उपलब्ध करून दिले होते. परंतु ज्यांनी लोकसहभागाच्या गोंडस नावाखाली साठवण तलाव क्रमांक 2 ची स्वच्छता करतांना 2014 साली साठवण तलावातून गवताची बेटे काढली तेव्हापासूनच कोपरगाव शहराच्या पाणी टंचाईची बीजे पेरली गेल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मंदार पहाडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
एकीकडे काळे सामाजिक बांधिलकी जोपासत साठवण तलावातील गाळ काढण्यासाठी पोकलेन मशिन देतात, तर दुसरीकडे ज्यांनी विकासकामासाठी निधी आणायचा, त्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी हातात मातीची घमेली घेऊन श्रमदान करतानाचे फोटो प्रसिद्ध करून विकासकामांबरोबरच साठवण तलावासाठीही निधी आणण्यास असमर्थ असल्याचे दाखवून दिले आहे. लोकसहभागाच्या नावाखाली साठवण तलाव क्रमांक दोनमधून मोठ्या प्रमाणात गवताची बेटे काढल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन साठवण तलवाचा पाझर तलाव झाल्यामुळेच मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटूच नये असी मानसिकता असलेल्या लोकप्रतिनिधी व नगराध्यक्षांमुळे हा निधी परत गेला आहे. आज सत्ता नसतानाही आशुतोष काळे यांनी चार नंबर व पाच नंबर साठवण तलावाचे काम मार्गी लागावे यासाठी आंदोलन सुरू केले आहे. पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासाठी काळे रस्त्यावरच्या लढाईबरोबरच न्यायालयीन लढाई देखील लढत असल्याचेही ते म्हणाले.