कॉंग्रेस पक्ष बनलाय फ्लॉप शोचा नवा ब्रॅंड
नवी दिल्ली- इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर शंका घेणाऱ्या विरोधकांवर आणि विशेषत: कॉंग्रेसवर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी टीकास्त्र सोडले आहे. ईव्हीएमवरून रडारड करणारी मंडळी पुन्हा सक्रीय झाली असल्याची खिल्ली त्यांनी उडवली.
लोकसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पीछेहाट झाल्यानंतर कॉंग्रेससह विरोधकांनी पुन्हा मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी सुरू केली आहे. नुकत्याच आपल्या रायबरेली मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणाऱ्या यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही अप्रत्यक्षपणे ईव्हीएम वादाकडे अंगुलिनिर्देश केला. आग लागल्याशिवाय धूर निघत नाही, अशा आशयाची एक म्हण आहे. मागील पाच वर्षांत निवडणूक प्रक्रियेबाबत विविध शंका उपस्थित झाल्या, असे सोनियांनी म्हटले.
त्यापार्श्वभूमीवर, भाजपचे नेते असणाऱ्या नक्वी यांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले. ईव्हीएमवर शंका घेणाऱ्यांनी आधी त्यावरील मतमोजणी आणि व्हीव्हीपॅट पावत्या यांची एकमेकांशी पडताळणी करण्याची मागणी केली. त्या पडताळणीत कुठलीही तफावत न आढळल्याने ते आता नवी कारणे शोधत आहेत. जनमताचा आदर आणि पराभवाबद्दल आत्मचिंतन करण्याऐवजी कॉंग्रेस अहंकार दाखवत आहे.
वास्तवाची जाणीव होत नाही तोपर्यंत कॉंग्रेसचा अहंकार आणि त्या पक्षाची नकारात्मकता कायम राहील. नकारात्मक आणि नैराश्ययुक्त राजकारणामुळे कॉंग्रेससारखा जुना पक्ष फ्लॉप शोचा नवा ब्रॅंड बनला आहे, असे नक्वी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.