कोलोंबो, (श्रीलंका) – इस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेतील चर्च आणि आलिशान हॉटेल्वर बॉम्बहल्ले करणारे सर्व दहशतवादी एकतर ठार झले आहेत किंवा त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र देशावर इसिसकडून आणखी दहशतवादी हल्ले होण्याची दाट शक्यता आहे, अशी भीती श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी व्यक्त केली आहे. श्रीलंकेतील वर्तमान सुरक्षा विषयक स्थितीबाबतच्या एका परिसंवादामध्ये ते बोलत होते.
इस्टर संडेच्या दिवशी 3 चर्च आणि 3 लक्झरी हॉटेलांवर दहशतवद्यांनी एकूण 9 आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. इस्लामिक स्टेटने जरी याची जबाबदारी स्वीकारली असली प्रत्यक्ष कृती नॅशनल थावहिथ जमाथ या संघटनेने घडवून आणल्याचा सरकारचा दावा आहे. या साखळी बॉम्बस्फोटांमागील सूत्रधारांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इसिसकडून आणखी हल्ले होण्याची शक्यता आहे. त्या दहशातवाद्यांच्या प्रगत नेटवर्कपासून संरक्षण मिळवण्यसाठी श्रीलंकेला अधिक आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
दहशतवादी हल्ल्यांचा धोका अद्याप संपलेला नाही. जागतिक दहशतवादाची आपत्ती आता श्रीलंकेवर आली आहे. या जागतिक दहशतवादाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी श्रीलंकेला जागतिक समुदायाबरोबर काम करावे लगणार आहे. मात्र त्यासाठी विदेशी सैन्य श्रीलंकेत आणले जाणार नाही, असेही विक्रमसिंघे यांनी स्पष्ट केले.