शहरवासीयांनी नळाला तोटी बसवावी
नव्या पाईपलाइनचे मीटर अनेकांनी काढून ठेवले असले तरी या मीटरबरोबर असलेली तोटी नळाला पुन्हा बसवावी. पाणी वाया जाऊ नये, याची काळजी घ्यावी. पालिका प्रशासन टंचाईचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे शुभांगी पोटे यांनी म्हटले आहे.
श्रीगोंदा – दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील काही नगरपालिकांनी दहा ते वीस दिवसाच्या अंतराने पाणी येत आहे. श्रीगोंदा नगरपालिका मात्र दिवसाआड पाणीपुरवठा शहराला करीत असताना तांत्रिक अडचणीमुळे एखादे ठिकाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो, मात्र यासाठी जर कुणी जर स्टंटबाजीसाठी आंदोलन करत असेल तर हा प्रकार दुर्दैवी आहे. घोड धरणावरुन केलेली पाणीयोजना यशस्वीच झाली असल्याने दुष्काळात देखील शहरासह वाडीवस्तीवर पाण्याची अडचण येत नसल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी दिली.
नगरपालिका कार्यालयासमोर एका नागरिकाने पाणीप्रश्नी आंदोलन केले होते. नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे की, जिल्ह्यात आणि शेजारच्या तालुक्यातील “क’ वर्ग नगरपालिकांनी दहा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळाची परिस्थिती असल्याने पाण्याची टंचाई असली तरी पालिका प्रशासनाने पाण्याची व्यवस्था योग्य केली आहे. वाडी वस्त्यांवर पिण्याचे पाणी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.