महाराष्ट्र बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष नामदेवराव थोरात हे जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्राला परिचित असलेलं नाव. थोरात यांनी बलुतेदार संघटनेच्या माध्यमातून बहुजन समाजाला न्याय देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गेली 30-35 वर्षे बलुतेदार संघटनेच्या माध्यमातून वंचितांना न्यायहक्क मिळवून देण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न ते करीत आहेत.
पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या विचारांचा पगडा असलेल्या या नामदेवरावांनी कोणतेही आर्थिक पाठबळ पाठीशी नसताना मंचरसारख्या ग्रामीण भागात तीन दशकांपूर्वी बलुतेदार संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या कामी त्यांना मुस्लीम, अल्पसंख्यांक, बहुजन समाजातील तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळाले. राज्याचे तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री बबनराव घोलप, भगवानराव वैराट, शशिकांत सोनवणे, ज्ञानेश्वर कांबळे, जयदेव गायकवाड यांच्यासारख्या समाजातील वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन घेत असताना नामदेवराव थोरात यांनी बलुतेदार संघटना जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांवर पोहचविली.
संघटनेचे काम करताना थोरात यांना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागला. प्रसंगी येरवडा कारागृहात कारावास भोगला. बहुजन समाजाच्या न्यायहक्कासाठी लढल्यानंतर अनेक समाजकंटकांनी दिलेल्या खोट्या तक्रारींवरून पोलिसांनी थोरात यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत; मात्र त्या गुन्ह्यांनाही न जुमानता थोरात यांनी संघटनेचे काम अविरतपणे सुरू ठेवल्याचे दिसून येते. कुणाकडूनही कोणत्या आर्थिक बाबीची अपेक्षा न बाळगता. स्वत:च्या खिशाला कात्री मारून सर्वसामान्यांना मदत करण्याची थोरात यांची भूमिका नेहमीच वंचितांना बहुमोलाची ठरली आहे.2003 साली पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जेष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात यांनी मंचर येथे बलुतेदार संघटनेचा मोठा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात जिल्ह्यातील हजारो संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. पद्मश्री ढसाळ यांनीही संघटनेच्या कामकाजाबाबत भरभरुन कौतुक केले. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसलेल्या महाराष्ट्र बलुतेदार संघटनेचे जाळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित राहिलेल्या नामदेवराव थोरात यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानही तितकेच महत्वाचे आहे.
पुणे जिल्ह्यात बहुजन समाजातील वंचित घटकांना बरोबर घेऊन महाराष्ट्र बलुतेदार संघटनेची आतापर्यंतची वाटचाल सामाजिक क्षेत्रातील इतर संघटनांना प्रेरणा देणारी ठरावी. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र बलुतेदार संघटनेचे कामकाज करत असताना संघटनेला शासकीय आणि राजकीय स्तरावर अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागला; मात्र या अडीअडचणींवर मात करूनही त्यांनी बलुतेदार संघटनेचे काम अविरत चालू ठेवले. त्यांच्या संघटनेच्या कामाची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप दिल्ली पुरस्काराने थोरात यांना गौरविण्यात आले.
बहुजन समाजातील वंचितांसाठी काम करणारे नामदेवराव थोरात हे भारतीय दलित साहित्य अकादमी (दिल्ली) आंबेगाव तालुक्याचे अध्यक्षपद देखील भूषवितात. राष्ट्रीय भ्रष्टाचारा विरोधी जनशक्ती, महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस म्हणूनही थोरात भूमिका बजावत आहेत. बहुजन समाजातील लोकांना शासकीय स्तरावर आर्थिक मदत मिळावी. त्यांनी स्वत:चे उद्योग धंदे सुरू करावेत, यासाठी आंबेगाव तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी अनेकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. एकूणच नामदेवराव थोरात यांच्या बलुतेदार संघटनेच्या माध्यमातून बहुजन समाजातील दिनदुबळ्या वंचित घटकाला आर्थिक स्त्रोत कसा प्राप्त होईल, याकडे संघटनेच्या माध्यमातून महत्वपूर्ण भूमिका बजावली जात आहे. बलुतेदार संघटनेचा त्यांनी घेतलेला वसा यापुढेही तसाच तेवत रहावा हिच अपेक्षा.
– रमेश जाधव, रांजणी