माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे साकळाई प्रश्नी विरोधकांवर टीकास्त्र
सत्तेत होतो, हे विसरू नये, पवारांना लगावला टोला
पंधरा वर्षे सत्तेत राहणाऱ्यां नेत्यांना हा विषय मार्गी लावता आला नाही. आता केवळ श्रेयवादासाठी साकळाई प्रश्नी लक्षवेधीत बोलणाऱ्या नेत्यांनी आपण सत्तेत होतो हे विसरू नये, असा टोला पाचपुते यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.
श्रीगोंदा – साकळाई उपसा सिंचन योजने करावी, ही अनेक वर्षांची मागणी आहे. आमदार राहुल जगताप यांनी लक्षवेधी मांडताना जुनीच मागणी नव्याने मांडली अन् सकळाई होणार नसल्याची नकार घंटा वाजून घेतली. या प्रश्नी केवळ मागणी न करता साकळाईच्या पाण्यासाठी पर्याय सुचविले असते, तर हासू झाले नसते, अशी टीका माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आ. जगताप यांच्यावर केली.
माऊली निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत पाचपुते बोलत होते. ते म्हणाले, भाजप सरकार साकळाईसाठी पूर्णपणे सकारात्मक आहे. साकळाई होणारच, यात कोणतीही शंका नाही. साकळाईच्या पाण्यासाठी असलेले पर्याय अमंलात आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डिंभे ते माणिकडोह बोगद्याचे टेंडर आठ दिवसांत होणार आहे. शिवाय कुकडी खोऱ्यालगत कोकणामध्ये पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडील कुकडी व इंद्रायणी खोऱ्यात वळविण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने कृष्णा खोरे विकास महामंडळाला दिले आहेत. या प्राप्त पर्यायातून साकळाईसाठी पाणी उपलब्ध होईल. साकळाईसाठी केवळ दोन टीएमसीच पाणी लागणार असल्याचे पाचपुते यांनी सांगितले.