मुंबई-दिल्लीचे पुणे लोकसभेवर लक्ष
पुणे – साहेबांचा निवडणूक अधिकाऱ्याला फोन, “किती टक्के मतदान झाले?’ अधिकाऱ्याचे उत्तर “साहेब, पाच मिनिटांत फायनल आकडेवारी देतो’. लगेच दुसऱ्या साहेबांचा फोन, प्रश्नही तोच आणि उत्तरही तेच. हीच गोष्ट काही मिनिटांच्या अंतराने झाल्यामुळे निवडणूक अधिकारी वैतागले होते. हे फोन केवळ पुण्यातील माननियांचेच नसून थेट मुंबई आणि दिल्लीतून अधिकाऱ्यांना फोन करून ही विचारणा केली जात होती.
त्यामध्ये विशेषत: काही विधानसभा मतदारसंघाबाबत वारंवार विचारणा होत असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली होती. पुणे लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातून “लिड’ घेणार? याबाबत पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची अंदाजबांधणी सुरू असते. त्यासाठी केवळ पुण्यातीलच नाही, तर दिल्ली आणि मुंबई येथील साहेबांचेही लक्ष पुण्यातील निवडणुकीवर होते.
प्रत्येक दोन तासांनी अधिकाऱ्यांचे एकापाठोपाठ एक फोन वाजत होते. “साहेब किती टक्के’ झाले, त्यावर अधिकाऱ्यांनी “काम सुरू आहे’, पाच मिनिटांत आकडेवारी कळेल’. त्यामुळे परत दहा मिनिटांनी फोन वाजल्यावर “साहेब झाली का आकडेवारी’ त्यावर अधिकाऱ्याने टक्केवारी सांगताच एवढीच? अशी प्रतिक्रिया समोरून येत होती. मात्र, या फोनने वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ अधिकाऱ्यांची चिडचिड झाली. मात्र, फोन यायचे बंद झाले नाही. अखेर अधिकाऱ्यांनी संयमाची भूमिका घेत मतदानाचा दिवस पूर्ण केला.