जिल्ह्यात सव्वा अकरा लाख लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा
टॅंकरच्या आवाजाकडेच डोळे
ग्रामीण भागात टॅंकर आल्यानंतर लगबगीने पाणी भरणे हेच लोकांचे मुख्य काम सध्या झालेले आहे. शेतात काडीचेही काम नाही अन् गावातील विहिरी, बारवात पाण्याचा टिपका नसल्याने सकाळपासून टॅंकरची वाट पाहणे हीच महिला वर्गाची ड्युटी बनली आहे. सार्वजनिक विहिरीत टॅंकरचे पाणी सोडले की एकच झुंबड उडते अन् अर्ध्या तासात विहीर पुन्हा रिकामी केली जाते. काही ठिकाणी गल्लोगल्ली जाऊन प्रतिमाणसी मोजून पाणी दिले जाते.
नगर – जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली असून टॅंकरच्या संख्येत वाढ होत आहे. आजअखेरपर्यंत जिल्ह्यात टॅंकरची संख्या 730 च्या घरात पोहोचली आहे. 485 गावे व 2 हजार 734 वाड्यांवरील सुमारे 11 लाख 30 हजार 764 लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने छोटे पाण्याचे स्त्रोत आता संपल्याने टॅंकरशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे यंदा टॅंकरची संख्या हजारी पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
यंदाचा पावसाळा संपूर्ण कोरडा गेला.पावसाने सरासरीही गाठली नाही.त्यामुळे खरिपासह रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून निसटला. सुदैवाने धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांचे साठे बऱ्यापैकी आहेत. परंतू आता या धरणांमध्ये देखील पाणीसाठा कमी झाला आहे. जिल्ह्यात ऑक्टोबरपासूनच टंचाईने डोकेवर काढल्याने टॅंकर सुरू करण्यात आले. दरम्यान,जिल्हाधिकाऱ्यांनी धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवत जुलैपर्यंत पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन केले. टंचाईच्या आवश्यकत्या उपाययोजना राबविण्यात आल्या असून शेवटची उपाययोजन म्हणजे टॅंकरने पाणीपुरवठा करण्यावरच सध्या प्रशासनाचा भर दिला जात आहे.
जिल्ह्या 730 टॅंकर चालू असून त्यात 22 शासकीय तर 708 खासगी टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मे अति तीव्र उन्ह्यळ्याचा एक महिना जायचे आहेत. या काळात तीव्र पाणी व चाराटंचाई भेडसावणार असल्याने टॅंकरची संख्या एक हजारच्या वर जाण्याची दाट शक्यता आहे. सध्या एकटा श्रीरामपूर तालुका वगळता उर्वरित सर्वच तालुक्यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सार्वधिक पाथर्डी तालुक्यात 142 टॅंकर चालू आहेत. सध्या तरी प्रशासनाकडून टंचाई उपाययोजनेत केवळ टॅंकरने पाणीपुरवठा करणे ही प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहे. अन्य योजनांसाठी पाण्याचे स्त्रोत नसल्याने नळपाणीयोजना प्रभावीपणे चालविणे अशक्य झाले आहे. आज ग्रामीण भागातील स्वतंत्र पाणीयोजना देखील बंद पडल्याने त्या ठिकाणी टॅंकर हा एक पर्याय उरला आहे.
तालुकानिहाय टॅंकरची स्थिती
संगमनेर- 40 गावे 243 वाड्यांना 53 टॅंकर, अकोले- 2 गाव, 17 वाडयांना 6 टॅंकर, कोपरगाव- 7 गावे 54 वाड्यांसाठी 10 टॅंकर, राहुरी- 2 गावे 1 टॅंकर, नेवासे- 29 गावे 54 वाड्यांना 26 टॅंकर, राहाता- 1 गाव 26 वाड्यांना 4 टॅंकर, नगर – 38 गावे 250 वाड्यांना 56 टॅंकर, पारेनर- 74 गावे 495 वाड्यांना 121 टॅंकर, पारनेर नगर पंचायत- 1 गाव 35 वस्त्यांवर 16 टॅंकर, पाथर्डी- 106 गावे 588 वाड्यांना 142 टॅंकर, शेवगाव- 40 गावे 171 वाड्यांना 56 टॅंकर, कर्जत- 70 गावे 448 वाड्यांसाठी 91 टॅंकर, जामखेड- 41 गावे 61 वाड्यांना 50 टॅंकर, श्रीगोंदा- 32 गावे 266 वाड्यांसाठी 46 टॅंकर. जामखेड नगरपालिका- 1 गाव 6 वाड्यांना 38 टॅंकर. पाथर्डी नगरपालिका 1 गावे 20 वाड्या वस्त्यांना 5 टॅंकर.