खासदार सुप्रिया सुळे यांची टीका
पुणे – “हे सरकार घाबरलेले आहे. त्यामुळे रंगाचे राजकरण करत आहे. त्यामुळेच काल दौंडमध्ये झालेल्या भाजपच्या सभेत प्रत्येकाची निरखून तपासणी झाली. त्यात सभेला आलेल्यांना साधा काळा मोजाही घालू दिला नाही. मात्र, आज आमच्या व्यासपीठावर माझ्या पक्षाच्या सरपंच आज येथे काळी साडी नेसून बसल्या आहेत,’ अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सरकारची खिल्ली उडवली.
दौंड तालुक्यातील पाटस येथे झालेल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार रमेश थोरात, अप्पासाहेब पवार, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यावेळी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, “बारामती मतदारसंघावर सगळ्यांचं विशेष प्रेम दिसतंय, सगळ्यांना बारामती हवीहवीशी वाटतेय, केंद्र आणि राज्यातील झाडून सगळे नेते येथे येऊन बसले आहेत. यातच माझं यश आहे, असे सांगून त्या म्हणाल्या, मी कोणावरही वयक्तिक टीका करणार नाही, आणि पातळी सोडून तर मुळीच बोलणार नाही कारण माझ्यावर कै. यशवंतराव चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत. तसेच मुख्यमंत्री फडणवीस येतील तेव्हा छत्र्या घेऊन बसा, कारण गाजरांचा मोठा पाऊस पडणार आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.