लखनौ- उत्तरप्रदेशात सोनभद्र येथे दहा अदिवासांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचेच हे लक्षण आहे. तथापी आपले हे अयपश लपवण्यासाठीच उत्तरप्रदेशचे प्रशासन कोणालाही तिकडे जाण्यास अनुमती देत नाही त्यासाठी त्यांनी कलम 144 या कलमाचा गैरवापर चालवला आहे असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे. हे कलम जमावबंदीचे आहे. ज्या भागात हे कलम पुकारण्यात येते तेथे चार पेक्षा अधिक माणसांचा जमाव करता येत नाही.
सोनभद्र येथे मृतांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या तृणमुल कॉंग्रेसच्या खासदारांना वाराणसी विमानतळावरच रोखण्यात आले. तसेच कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन एका रेस्ट हाऊस मध्ये ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मायावती यांनी हा आरोप केला.
सोनभद्र येथे गावचा सरपंच आणि त्यांच्या समर्थकांचा जमीनीच्या वादातून स्थानिक गोंड अदिवासींशी संघर्ष झाला. त्यावेळी दहा जणांची हत्या करण्यात आली तर तेथे 28 जण जखमी झाले आहेत. आमच्या सरकारच्या काळात आदिवासींच्या हितांची जपणूक केली जात होती. पण योगींच्या राज्यात अदिवासींची सर्रास हत्या होत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी 29 जणांना अटक केली आहे.