पुणे – माझी बांधिलकी कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही, तर शेतकरी, सैनिक आणि सर्वसामान्यांच्या दु:खाशी आहे. राजकीय नेत्यांकडून पुलवामावरून मते मागणे चुकीचे असून, सैन्याचा राजकीय वापर करू नये. असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.
विक्रम गोखले ऍक्टिंग ऍकॅडमीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या राजकारण म्हणजे व्यवसाय झाला आहे. त्यामुळे सुशिक्षित तरूणांनी राजकारणात येण्याची गरज आहे, असे सांगत विक्रम गोखले म्हणाले, “फक्त भाऊ, दादा आणि साहेब म्हणत राजकारण्यांच्या पाठीमागे जाऊ नका. कारण ज्यावेळी कार्यकर्त्यांवर वेळ येते, त्यावेळी नेते मागे राहतात आणि काठ्या-लाठ्या कार्यकर्त्यांना खाव्या लागतात. सध्या राजकारणामध्ये अभिनेते प्रवेश करीत आहे. मात्र, राजकारण समजून घेण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. अभिनय क्षेत्रात एवढी वर्षे काम केल्यावर आता तुम्ही आत्मचरित्र लिहणार का त्यावर बोलताना गोखले म्हणाले, “मी आत्मचरित्र लिहिणार नसून सर्व आत्मचरित्र खोटी असतात. माझ्यापेक्षा अनेक हुशार माणस जगात आहेत. मी आत्मचरित्र न लिहिता अभिनेते, दिग्दर्शक अनेक व्यक्तींचे अनुभव मांडणार असल्याचे यावेळी गोखले यांनी सांगितले.’