चाकण – सैनिकांच्या शौर्याचे भांडवल होता कामा नये. त्यांच्या शौर्यावर जगणारे आम्ही नाही आहोत. आपण आता पाकिस्तान दिसता कामा नये, अशी कारवाई आपल्याला पुढे करायची आहे. म्हणून शिवाजीराव आढळराव यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून केंद्रात मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चाकण येथे झालेल्या विराट सभेत केले.
शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची चाकण येथे विराट सभा झाली. या सभेत झालेल्या ते बोलत होते. यावेळी गिरीश बापट, मिलिंद नार्वेकर विजय शिवतारे, नीलम गोऱ्हे, रवींद्र मिर्लेकर, आमदार सुरेश गोरे, शरद सोनवणे, महेश लांडगे, जिल्हाप्रमुख राम गावडे, यांसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजीराव यांच्या सभेला आल्याशिवाय निवडणुकीची गंमत येत नाही. शिवाजीरावांचा विजय हा समोरच्याचे डिपॉझिट जप्त करणारा दणदणीत विजय मला हवा आहे. शिवाजीराव यांच्या सभेला आल्याशिवाय निवडणुकीची गंमत येत नाही. असा शब्द त्यांनी यावेळी सभेला जमलेल्या विराट जनसमुदाय कडून घेतला. यावेळी प्रेक्षकांमधून खासदार आढळराव यांना दिल्लीत मंत्री पद द्या असा नारा लावला गेला. त्यावेळी गिरीश बापट यांच्या कडे पाहत, तुम्ही पुण्याचे पालकमंत्री आहात पण मी शिवसेनेच्या 23 खासदारांचा पालक आहे. जनतेच्या भावनेचा निश्चितच विचार केला जाईल. लाज वाटते का? असे आम्हाला विचारणारे यांचा कधी लाजेशी संबंध आला आहे का? देशद्रोह यावरचा कलम काढणार असे कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात लिहिले आहे. मात्र आम्ही मातेशी आणि मातीशी इमान राखणारा भगवा खांद्यावर घेतला आहे. पन्नास वर्षांमध्ये आम्ही भगवा बदलला, ना नेता बदलला. आमचे पंतप्रधानांचे उमेदवार नरेंद्र मोदी. त्यांच्याकडे एक नाव तरी आहे का? आमच्या खासदारांनी केलेली कामांचे कट-पेस्ट विरोधक करत आहेत. खासदार हा तुमच्या सोबत राहून काम करणारा पाहिजे की नाटकात काम करणारा? त्यामुळे मी केवळ मत नाही तर आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. बैलगाडी शर्यत हा प्रश्न सोडवायला सरकारची गरज आहे. बैलगाडी शर्यत हा प्रश्न मी स्वतः लक्ष घालून सोडवेन. चौकार, षटकार मारला पाहिजे आयपीएल सुरू आहे.
उमेदवार खासदार आढळराव पाटील म्हणाले, पुणे-नाशिक, पुणे-नगर रस्त्यासाठी मोदी सरकारच्या काळातच निधी उपलब्ध झाला. मात्र पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारने रस्त्यांच्या कामासाठी एक दमडाही दिला नाही. गेली पंधरा वर्षे मी या मतदारसंघाचा खासदार आहे आणि मी त्या माध्यमातून खेड सिन्नर रस्त्यासाठी 1100 कोटी रुपये मंजूर करून घेतले असून 80 टक्के कामही पूर्ण झाले आहे. तसेच आगामी चार वर्षात पुणे नाशिक हा महत्वकांक्षी रेल्वे या ट्रॅकवर धावेल.
सुरेश गोरे म्हणाले, चाकण येथे झालेली सभा हे विजयाचीच असते हे जणू समीकरणच झाले आहे. चाकण मार्केट यार्ड येथील जागा विरोधकानी खोडसाळ पणा करीत मिळवू दिली नाही तरीही आता शिवसेनेचा विजयरथ कोणीही रोखू शकत नाही.
शरद सोनवणे म्हणाले, जिल्ह्यात सलग चारवेळा निवडून येणारे खासदर म्हणून आढळराव पाटील यांचे नाव घेतले जाणार आणि त्याचे साक्षीदार ही खेड, शिरूरची जनता असणार. यावेळी आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडा शर्यती युती सरकारच सुरू करेल व आतापर्यंत युती सरकारनेच खर्च केले, असे सांगितले. यावेळी पालमंत्री गिरीश बापट यांसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.