– विवेकानंद काटमोरे
जास्त कमाईची अपेक्षा ठेवू नका, ग्राहकाला देव मानून त्यांची सेवा करा. मारामारी करू नका, व्यवसायात भरभराट होईल, हा गुरूमंत्र पूर्वजांनी पाळला. तो आम्हालाही दिला. त्याचे पालन आम्ही आजही करतो. त्यामुळेच आम्ही आमच्या व्यवसायात 80 वर्षे झाले यशस्वी आहोत. यशाचा हा गुरूमंत्र व्यावसायिक पवनशेठ अग्रवाल आणि शैलेश अग्रवाल यांनी मांडला.
हडपसर – सतीशशेठ अग्रवाल हे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. मिठाई, नमकीन आणि ड्रायफ्रूट विक्री हा त्यांचा प्रमुख व्यवसाय. “अग्रवाल स्वीट होम’ या फर्मचे ते संचालक आहेत. 1938 साली पणजोबा प्यारेलाल अग्रवाल यांनी “अग्रवाल स्वीट्स’ दुकान सुरू केले. पुढे आजोबा मुन्नालाल अग्रवाल यांनी हा व्यवसाय स्थिर केला आणि वडील सतीश अग्रवाल यांनी “अग्रवाल स्वीट्स होम’ हे मोठ्या शोरूम स्वरूपात नावाला आणले आणि याच्याच दोन शाखा आम्ही मोठे बंधू शैलेश आणि मी सुरू केल्या. “अग्रवाल स्वीट्स’ सुरू होत असताना साबळे आत्या आणि तापकीर कुटुंबीयांनी केलेल्या मदतीची आजही आठवण होत असल्याचे अग्रवाल सांगतात. “अग्रवाल स्वीट होम’मध्ये डोळे झाकून ग्राहक मिठाई खरेदी करतात. तेथे भेसळ नावाचा प्रकार नाही, याची खात्री ग्राहकांच्या मनात पक्कं घर करून बसलीय. ग्राहकांच्या या विश्वासाला या अग्रवाल कुटुंबीयांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. बालूशाही, जिलेबी, काजु कत्तली, रसमलाई,काजू गज्जग, स्ट्रॉबेरी काजू कत्तली ही “अग्रवाल स्वीट्स होम’ची प्रसिद्ध मिठाई.
गाडीतळ आणि आकाशवाणी समोर मुन्नालाल पॅराडाईज येथे “अग्रवाल स्वीट्स आणि नमकीन’ अवघ्या हडपसरकरांचा विश्वासाचं ठिकाण झालाय. गाडीतळ येथील शोरूममध्ये वडील किंवा भाऊ आणि आकाशवाणी येथील स्वीट्स होम येथे पवनशेठ स्वत: थांबून ग्राहकांची सेवा करत. प्रत्येकाला चांगली सेवा मिळाली पाहिजे याकडे कटाक्षाने पाहत. ग्राहकांशी सौजन्याने वागलं पाहिजे यासाठी कामगारांना धडे दिले. त्यातून ग्राहकांचा विश्वास जिंकला गेला. आजही अग्रवाल परिवाराची पाचवी पिढी हा मंत्र जपत या व्यवसायात यशस्वीपणे वाटचाल करते आहे. पिढ्यानपिढ्या असलेला ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी अग्रवाल परिवाराचा संवाद असतो. हेच आमच्या यशाचे गमक असल्याचे पवनशेठ अभिमानाने सांगतात. ग्राहकांनी दिलेल्या प्रेमामुळे आजही हडपसरमध्ये मिठाई म्हटलं की अग्रवाल स्वीट्स होम नाव सहज डोळ्यासमोर येते आणि येथे येऊन मिठाई खरेदी केल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही, अशी भावना ग्राहक येथे पवनशेठना भेटल्यावर नक्की व्यक्त करतात.