अमेठी- स्मृती इराणी यांचे माजी सचिव सुरेंद्रसिंह यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयितासह एकूण पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. वासिम असे या मुख्य संशयिताचे नाव आहे. त्याला शल्हापुर गावातून गुरूवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला पोलिस पकडण्यासाठी गेले असताना त्याने पोलिसांवरच गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांकडूनही झालेल्या गोळीबारात वासिम जखमी झाला आहे. त्याला स्थानिक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
त्याने केलेल्या गोळीबारात एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला आहे. हत्या झालेले सुरेंद्रसिंह हे 50 वर्ष वयाचे होते. ते बरौली गावचे माजी सरपंचही होते. अमेठी पासून 25 किमी अंतरावर त्यांची 25 मे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे अमेठी संसदीय क्षेत्रातील ते एक निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जात होते.