लखनौ: लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात झालेल्या समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाज पार्टी (बसपा) यांच्यातील आघाडीबाबत सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. आमची आघाडी हा एक प्रयोग होता त्यामुळे यामध्ये आम्हाला आमचे दोष कळाले असे त्यांनी म्हटले आहे.
लखनौ येथे माध्यमांशी संवाद साधतांना अखिलेश म्हणाले, जीवनात बऱ्याचदा आपण केलेले प्रयोग अयशस्वी होतात. मात्र, त्यामुळे आपल्यातील गुणदोष कळतात. त्यातून आपण शिकत असतो. यावेळी इशाऱ्यातून त्यांनी भविष्यात मायावतींसोबत पुन्हा निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले. त्यामुळे आता राजकारणाचा आमचा रस्ता खुला झाला असल्याचे त्यांनी म्हटले.
मायावतींनी देखील आघाडी तुटल्याचे जाहीर करताना आमचे राजकारणाचे रस्ते वेगळे झाले असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्याशी वैयक्तिक संबंध कायम राहतील असे त्यांनी म्हटले होते. यावर बोलताना अखिलेश म्हणाले, आघाडीनंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत मायावतींबाबत बोलताना मी सांगितले होते की, माझा सन्मान हा त्यांचा सन्मान असेल तीच गोष्ट मी पुन्हा एकदा सांगतो.
यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसाबाबत अखिलेश यांना पत्रकारांनी विचारले असता आपण वाढदिवस गांभीर्याने घेत नसल्याचे ते म्हणाले. कारण, वाढदिवसादिनी तुमचे आयुष्य एक वर्षाने कमी झालेले असते.