नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानवर कारगीलच्या युद्धात मिळवलेल्या विजया निमीत्त भारतीय लष्कराने 25 जुलै ते 27 जुलै या अवधीत विजयोत्सवाचे आयोजन केले आहे. कारगीलवरील विजयाचा हा 20 वा विजय दिवस असणार आहे. या मुख्य सोहोळ्याच्या प्रीत्यर्थ जुलैच्या पहिल्या आठवड्यात संपुर्ण देशभर विविध कार्यक्रमांचेहीं आयोजन करण्यात आले आहे.
14 जुलै रोजी दिल्लीत विजयी ज्योत प्रज्वलीत केली जाईल. दिल्लीच्या नॅशनल वॉर मेमोरियल येथे हा ज्योत प्रज्वलन सोहोळा होईल. त्यानंतर ही ज्योत अकरा शहरांमधून द्रास पर्यंत मिरवली जाणार आहे. तेथे कारगील युद्धस्मारकाजवळील ज्योतीत ही ज्योत विलिन केली जाणार आहे. या निमीत्त होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेतले जाणार आहे. भारताने कारगील आणि सियाचिनच्या या दुर्गम पर्वत राजीत भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी सैन्याला हुसकाऊन लावताना मोठीच मुर्दुमकी गाजवली होती. आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन न करता भारतीय लष्कराने अत्यंत धैर्याने ही चढाई जिंकत पाकिस्तानी घुसखोरांना नेस्तानबूत केले होते.