नवी दिल्ली – अनेक कारणांमुळे जागतिक मंदी रेंगाळलेली आहे. त्यामुळे परदेशातून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर भारतातून होणाऱ्या निर्यातीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्वांचा भारताच्या आर्थिक वाढीवर परिणाम संभवतो, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.
मात्र, यातूनही भारताला आपला मार्ग काढावा लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहेत. देशातून मागणी वाढावी यासाठी बऱ्याच उपाययोजना करण्याची सरकारची तयारी चालू आहे. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीतही निर्यात कशी वाढवावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. अमेरिकेने चीन, मेक्सिको, कॅनडा, युरोपीय समुदायासह अनेक देशांबरोबर एकतर्फी व्यापार युद्ध सुरू केले आहे.
या संबंधात निर्णय घेण्यासाठी विशिष्ट कालमर्यादा न ठेवल्यामुळे जागतिक शेअर बाजार आणि गुंतवणुकीवर परिणाम होत आहे. त्याचा त्रास भारतालाही होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत जपान, ब्रिटन, फ्रान्स, सिंगापूर, कोरिया, स्पेन, कॅनडा, मेक्सिको, सौदी अरेबिया. दक्षिण आफ्रिका, चिली, ऑस्ट्रेलियाबरोबर व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे गोयल यांनी सांगितले.
वाणिज्यमंत्र्यांच्या बॅंकर्सना सूचना
निर्यातदारांना शक्य तितक्या लवकर कमी व्याजदराने 1,73,150 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा कमी व्याजदरावर उपलब्ध करावा, अशा सूचना गोयल यांनी दिल्या आहेत. निर्यातदारांना लंडन सेंटर बॅंक ऑफर रेट दराने हा कर्जपुरवठा करण्याची गरज असल्याचे गोयल यांनी सांगितले. भारताला आगामी काळात निर्यात वाढविण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, निर्यातीतील सर्व अडथळे दूर करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.