नवी दिल्ली -केरळमध्ये मान्सून दाखल झाला असला तरी देशाच्या बऱ्याच भागांत उष्म्याची लाट कायम आहे. देशाची राजधानी दिल्लीत तर सोमवारी आजवरच्या उच्चांकी तापमानाची (48 अंश सेल्सिअस) नोंद झाली.
दिल्लीत रविवारी 43.8 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान होते. त्यानंतर तापमानाचा पारा आणखीच वाढल्याने दिल्लीकर उकाड्याने हैराण झाले. याआधी दिल्लीत 9 जून 2014 ला 47.8 अंश सेल्सिअस इतके सर्वोच्च तापमान नोंदले गेले होते.
मान्सूनने केरळ गाठले असले तरी देशाच्या उत्तर आणि मध्य विभागांना अजून तीव्र उष्म्यापासून दिलासा मिळालेला नाही. चालू आठवड्यात उष्म्याची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने याआधीच दिला आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशातील उष्म्याची तीव्रता इतक्यात कमी होण्याची चिन्हे नाहीत.
तेलंगणच्या काही भागांत सोमवारी 43 ते 44 अंश सेल्सिअस इतके तापमान होते. ओडिशाच्याही बऱ्याच भागांत पारा 40 अंशांच्या वर राहिला. मान्सूनअभावी पश्चिम बंगालच्या काही भागांत तापमान सरासरीच्या 2 ते 3 अंशांनी चढे राहण्याची शक्यता आहे.