पुणे – राज्यात आचारसंहिता शिथिल केल्यामुळे पुणे जिल्ह्यातील टंचाईबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी तत्काळ बैठक घेऊन कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता 2019-20 मधील जास्तीत जास्त विकासकामांना लवकर मान्यता देऊन ती कामे सुरू होतील, असा दृष्टीने सर्व विभाग प्रमुखांनी आतापासून नियोजन करून पूर्वतयारी करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात पाणी आणि चारा टंचाईची भीषणता अधिक तीव्र झाली असून, जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे पाण्याचे साठेही संपत चालले आहे. त्यामुळे पाण्याचे साठे उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू असून आचारसंहितेमुळे टंचाई आराखड्यातील राहिलेल्या कामांना मान्यता देऊन ती मार्गी लावण्यासाठी ग्रामीण व पाणीपुरवठा विभागाची लगबग सुरू आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच टंचाईबाबत बैठक झाली असून, 30 मेपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेकडून रस्ते, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, स्मशानभूमी, शाळा बांधणे, संरक्षक भिंत असे अनेक विकासकामे केली जातात. त्याचबरोबर वैयक्तिक लाभाच्या योजनाही राबविली जातात. मात्र, यावर्षी आचारसंहितेमुळे प्रशासनाला कमी कालावधीत अधिक कामे करावी लागणार आहेत. कारण, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून ते सप्टेंबर या तीन महिन्यांत सर्व विकासकामांचे नियोजन करून त्यांना मान्यता देणे, डीबीटी योजना राबविणे हे प्रशासनासमोर आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर कामाचा ताण कमी व्हावा, ऐनवेळी होणारी धावपळ कमी व्हावी यासाठी आतापासून कामाचे नियोजन करा, अशा सूचना विभागप्रमुखांना दिल्या आहेत.