मुंबई – मुंबईमधील विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरात धान्याने भरलेला ट्रक पलटी झाल्याने मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, यामध्ये चौघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
अश्विन हेवारे, विशाल शेलार, अब्दुल हमीद शेख आणि चंद्रशेखर मुसळे यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर चांद हसन शेख ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. जखमी व्यक्तीला घाटकोपरमधील ‘राजावाडी’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विक्रोळी येथील सूर्यानगर पोलीस ठाण्याजवळ एका गटाराचे काम चालू होते. हा भरलेला ट्रक जात असताना ट्रकचा मागील चाक गटाराच झाकण तोडत आत गेल्यामुळे ट्रक जागीच पलटी झाला. यावेळी तिथे उभे असलेले पाच जण त्या ट्रक खाली आले. ट्रक धान्याने भरलेला असल्यामुळे त्या चौघांचा जागीच दबून मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला.
या गटाराचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे हे झाकण मोडले आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे यात पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टर दोषी आहे. असं स्थानिक नागरिकांनी म्हंटल आहे.