नवी दिल्ली – पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीची माहिती दिली. त्या राज्यात निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात राजकीय हिंसाचार उफाळून आला असून त्यात आत्तापर्यंत बारा जणांचे बळी गेले आहेत.
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राज्यपाल म्हणाले की राज्यातील कायदा स्थितीबाबत मी या दोघांना माहिती दिली आहे. तथापी त्याचा तपशील आपल्याला जाहींर करता येणार नाही.
पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाण्याची शक्यता आहे काय असे विचारता ते म्हणाले की त्या विषयावर आमच्या भेटीत चर्चा झाली नाही. पश्चिम बंगाल मधील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवरून त्या राज्यातील सरकार आणि केंद्र सरकारमध्ये मोठे वाकयुद्ध रंगल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी दिल्लीला जाऊन गृहमंत्री आणि पंतप्रधानांची भेट घेणे याला मोठे महत्व दिले जात आहे.
यातूनच राज्यातील ममता बॅनर्जींचे सरकार केंद्र सरकारकडून बरखास्त केले जाण्याची चर्चा होऊ लागली आहे. काल रविवारीच गृहमंत्रालयाने राज्य सरकारला एक इशारा संदेश पाठवून पश्चिम बंगाल मधील हिंसक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. तथापी पश्चिम बंगाल मध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या तुरळक घटनांचा केंद्र सरकारकडून मोठा बाऊ केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता.