वाई – अनपटवाडी बावधन येथे आग्या मोहळे काढल्यानंतर पेटता बोळा वाळक्या गवतावर पडून आग लागली. मात्र यामध्ये कुठलीही जीवित हानी अथवा नुकसान झाले नाही. वाई पालिकेचा अग्निशमन व ग्रामस्थांनी वेळीच आग आटोक्यात आणली. काल रात्री आठच्या सुमारास काही मध गोळा करणारे आग्या मोहोळ काढण्यासाठी अनपटवाडी येथील तिन्ही आंबा ओढा नावाच्या शिवारात गेले. त्या ठिकाणी महू काढण्यासाठी जाळ केला.
महू काढल्यानंतर अर्धवट जळालेले पोळे गवतावर पडून आग लागली. रात्रीच्या वेळी ओढ्याजवळ आग पाहून ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. विद्युतपुरवठा सुरू असल्याने विहिरीतील पाणी व घरातील पाणी बादल्याने मारून आग पसरू नये यासाठी ग्रामस्थानी प्रयल केले. आग मोठ्या प्रमाणात पसरली असती तर काही घराचे, जळणाचे, शेताचे नुकसान झाले असते. यावेळी मधवाले यांनी आग पाहून तेथून पळ काढला. वाळक्या गवतामुळे आग पसरू लागली. यामध्ये किरकोळ जळण जळाले. गावकऱ्याच्या दक्षतेमुळे नुकसान टळले. तर अगदी वेळेवर वाई अग्निशमन दाखल झाल्याने आग काही वेळातच आटोक्यात आली.