मुंबई: ‘किडनी घ्या पण बियाणे द्या’ अशी मागणी करणाऱ्या नामदेव पतंगे या शेतकऱ्याला आज अटक केली गेली. सरकारला जाब विचारण्यासाठी आले असता त्यांना आज विधानभवन परिसरात अटक करण्यात आली. तसेच अशोक मनवर हे शेतकरी मुख्यमंत्र्यांनी दिलेले कर्जमाफीचे प्रमाणपत्र घेऊन विधानभवनात आले होते. त्यांनाही आज अटक करण्यात आली, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाव्दारे दिली आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, ही लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या जुलमी सरकारचा निषेध! या निष्पाप शेतकऱ्यांची तात्काळ सुटका करून ज्या पोलिसांनी ही कारवाई केली त्यांचे निलंबन करावे अशी आमची मागणी आहे.