दुष्काळामुळे तालुक्यातील संपूर्ण बागाच्या बागा गेल्या जळून : उत्पादक अडचणीत
वाघापूर – पुरंदर तालुक्याला जसा दैदिप्यमान इतिहास आहे, तसाच इथल्या मातीला वेगळा गंध आणि वास आहे आणि म्हणूनच इथाल्यात मातीत पिकणाऱ्या प्रत्येक पिकाला बाजारपेठेत नेहमीच मोठी किमत मिळते. त्यातील प्रसिद्ध असणारा मिठा बहर म्हणजे अंजीर हे फळपिक होय. अंजीर पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात, परंतु यावर्षी ऐन हंगामात मोठा दुष्काळ पडल्याने संपूर्ण बागाच्या बागा जळून गेल्या आहेत. शेतात केवळ झाडे उभी असून शेतकरी मोठ्या आतुरतेने पाण्याची वाट पाहत आहेत.
तालुक्यात खरीप हंगामातील वाटाणा हे पीक खूप प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे येथील सीताफळ आणि अंजीर ही फळपिके इथल्या विशिष्ट हवामानामुळे संपूर्ण राज्यात आणि परदेशातही लोकप्रिय आहेत. पुरंदरचा अंजीर म्हटले कि, या फळपिकाला जास्तीचा भाव नेहमीच मिळतो. कारण इथली जमीन आणि हवामान, त्याचप्रमाणे फळाचा आकार, रंग यामुळे ग्राहक लगेचच आकर्षित होतात. तर तालुक्यात दिवे घाटातून प्रवेश केल्यावर लगेचच जी गावे लागतात ती झेंडेवाडी, काळेवाडी, पवारवाडी, सोनोरी, दिवे आणि इथल्या परिसरात अंजिराचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात.
तसेच डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून अंजिराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होते आणि याचकाळात थंडी संपून उन्हाळा सुरू होत असल्याने थंड, गोड, रुचकर असलेल्या फळाला साहजिकच चांगली मागणी मिळते. तसेच बाजारभावही चांगला मिळतो. फळ सुकून भाव पडू नये, यासाठी शेतकरी पहाटे उठून अंजिराची तोडणी करतात आणि सकाळीच बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. ताज्या फळांना भावही चांगला मिळतो.
या वर्षी मात्र, तालुक्यात दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यातील सर्वच पाणीसाठे संपले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना शेताला पाणी कोठून मिळणार? या विवंचनेत शेतकरी आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे शेततळी अथवा इतर पर्याय आहेत. त्यांनी कशीबशी शेती जागविली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे काहीच पर्याय नाही त्यांची अवस्था खूपच दयनीय आहे. केवळ पाण्याच्या कारणामुळे अनेक बागा जळून नष्ट झाल्याने ऐन हंगामात अंजीर उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तसेच ऐन हंगामात सिझन वाया गेल्याने याचा पुढील हंगामावरही परिणाम होत असतो. भांडवल हातात नसल्याने आगामी खरीप हंगामातील पिकांचे नियोजन करता येत नाही, परत वर्षभर नुसती झाडे कशी सांभाळायची? म्हणून कित्येक शेतकरी सरळ बागाच तोडून टाकीत असतात. पर्यायाने फळपिकांचे क्षेत्रही कमी होते आणि किरकोळ नगदी पिके घेण्याकडे कल वाढल्याने आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागते.