भारिप बहुजन महासंघाचे माजी सरचिटणीस मिलिंद पखाले यांचा राजीनामा
नागपूर – लोकसभा निवडणुकीच्या निकालपूर्वीच वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मदत करण्यासाठी या निवडणुकीत काम केल्याचा आरोप करत भारिप बहुजन महासंघाचे माजी सरचिटणीस मिलिंद पखाले यांनी राजीनामा दिला आहे.
आंबेडकरी समाजाला काही वेगळे वळण मिळेल म्हणून 12 वर्षांपूर्वी भारिप बहुजन महासंघात दाखल होऊन प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारले होते. मात्र आजची भारिप केवळ सत्ता संपादनाचे खोटे स्वप्न दाखवत असल्याचा आरोप मिलिंद पखाले यांनी केला. वंचित बहुजन आघाडीला राज्यात एकही जागा मिळणार नाही. याउलट वंचितमुळे 7 ते 8 ठिकाणी भाजपला विजय मिळण्यास मदत होईल. वंचित आघाडीच्या 99 टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.
मिलिंद पखाले यांच्यासह पूर्व विदर्भातील भारिप बहुजन महासंघाच्या सुमारे 20 जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीचा सहकारी असलेल्या एमआयएमने केवळ एकाच जाग लढवून आपला बाणा सिद्ध केला आहे. असा बाणा वंचित बहुजन आघाडीलाही दाखवता आला असता, मात्र त्यांनी तो दाखवला नाही, असे मिलिंद पखाले यांनी म्हटले आहे.