सोमेश्वरनगर – नीरा डावा कालव्याचे आवर्तन आठ दिवसांपूर्वी बंद केल्याने सोमेश्वर परिसरातील शेतकरी हतबल झाले असून पावसासाठी त्याचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
शेतीला पाणीपुरवठा कमी पडणार असल्याने व मान्सूनपूर्व पाऊस न कोसळल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सुमारे दोन महिने कालवा भरुन वाहत होता त्यामुळे या भागातील हजारो एकर शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाले होते. त्यामुळे पिकांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही सुटला होता. मात्र, वीर धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने आणि पालखी सोहळ्यासाठी पाणी राखून ठेवल्याने कालव्याचे पाणी बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला त्यामुळे कालवा आता कोरडा पडला आहे. सोमेश्वरनगर परिसरातील शेतकरी मुख्य पीक म्हणून ऊस हे पीक घेतात मात्र, सध्या कालवा आणि नीरा नदीत पाणी शिल्लक नसल्याने या भागातील ऊस शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे. कालवा कोरडा पडल्याचा परिणाम बोरअवेल व विहिरींवर झाला असून त्यातील साठाही कमी झाला असल्याने बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत आहे.