नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधील अलीगढ येथे झालेल्या अल्पवयीन मुलीच्या हत्येसंबंधी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून याप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी केली आहे. पैशांच्या देवाणघेवाणीतुन झालेल्या वादात अडीच वर्षांच्या मुलीची हत्या करून, तिचा मृतदेह कचराकुंडीत फेकण्यात आला होता. मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून सदर प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असुन त्याचा तपास सुरू आहे.
या संदर्भात स्वाती मालीवाल यांनी पत्रात म्हटले आहे की, अलीगढच्या घटनेतील गुन्हेगारांना दोन महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा सुनावली जावी, ज्यामुळे देशात एक महत्वपुर्ण संदेश जाईल आणि महिला आणि मुलींना आशा प्रकारची वागणुक देणाऱ्यांच्या मनात एक दहशत निर्माण होण्यास मदत होईल. शिवाय त्यांनी हा देखील मागणी केली आहे की, अपराध संशोधन कायदा 2018 ची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जावी.
या संदर्भात बोलताना डीजीप आनंद कुमार यांनी सांगितले आहे की, या प्रकरणाचा जलदगतीने सखोल तपास करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलेले आहे. आरोपींवर पॉक्सो कायद्यानुसार कारवाई केले जाणार आहे.