नवी दिल्ली : “मोदी-2′ सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या आणि सकारात्मक घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये अन्नदात्याला ऊर्जादाता करण्यासाठी कृषी आणि दूध उद्योगासाठी योजना आखणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
झिरो बजट शेतीसाठी प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आयातीऐवजी निर्यातीवर जास्त भर देणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारच्या अनेक योजना अंमलात आणणार आहे. 10 हजार नवीन शेतकरी उत्पादक संघ तयार करणार आहे. तसेच दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी डेअरीच्या कामांवर भर दिला जाणार आहे. डाळींबाबत आपण स्वयंपूर्ण होऊ, असेही त्यांनी सांगितले.
मासेमारी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वपूर्ण आहे. मासेमारीसाठी महत्वकांक्षी योजना आणणार असून त्यांना सहाय्य करणार आहोत. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मत्स्य व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधा मजबूत करणार आहे. शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जा वापरावर सरकारचा भर असणार आहे.
पंतप्रधान ग्रामीण डिजीटल साक्षरता अभियानांतर्गत दोन कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. देशातील प्रत्येक पंचायतीला डिजीटल केले जाईल. पीपीपी तत्वावर काम करण्यात येणार आहे.