नवी दिल्ली – मतदान सुरू झाल्यानंतर आधी पाच व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यात यावी. तसेच फेरफार आढळल्यास त्या विधानसभा मतदारसंघातील सर्व व्हीव्हीपॅटची मोजणी व्हावी, ही विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने बुधवारी फेटाळून लावली आहे.
विरोधकांची व्हीव्हीपॅट संदर्भातली मागणी पूर्ण केली तर संपूर्ण निकाल स्पष्ट होण्यासाठी कदाचित दोन ते तीन दिवसही लागू शकतात, असे सांगितले जात होते. पण निवडणूक आयोगाने विरोधकांची मागणी फेटाळली आहे. ईव्हीएम मशीनची मतमोजणीच आधी सुरू केली जाईल आणि नंतर व्हीव्हीपॅटच्या मतपावत्यांची मोजणी करून त्याचे आकडे ईव्हीएमच्या आकड्यांशी पडताळले जातील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
आधी व्हीव्हीपॅटच्या मतपावत्यांची मोजणी करावी, अशी मागणी असल्याने त्याची पडताळणी संपेपर्यंत निकाल जाहीर करता येणार नाही आणि त्यास विलंब होईल, असे आयोगाच्या काही अधिकाऱ्यांचे म्हणणे होते.
विरोधी पक्षांच्या 21 नेत्यांनी मंगळवारी निवडणूक आयोगाकडे व्हीव्हीपॅट मशीमधल्या मतपावत्या प्रथम मोजण्याची मागणी केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी बैठक काही वेळापूर्वी संपली. त्यानंतर आयोगाने मतमोजणीत कुठलाही बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, कॉंग्रेस नेते आणि वकील अभिषेक सिंघवी यांनी मंगळवारी आयोगासमोर विरोधकांची बाजू मांडली होती. विरोधकांनी निवडणूक आयोगाने आमच्या मागण्यांचा विचार करु असे सांगितले असल्याची माहिती दिली होती. मात्र यावेळी निवडणूक आयोगाची देहबोली सकारात्मक नव्हती, असेही विरोधकांनी म्हटले होते. मात्र विरोधक पराभवाच्या भीतीने हे सर्व करत असल्याचा टोला भाजपाने लगावला होता.