वनविभागाची कठोर भूमिका केव्हा ?
काजवा महोत्सवात काजवे पाहण्यासाठी पहाटच्या सुमारास गेलेल्या पर्यटकाचा अपघातात मृत्यू होऊनही वन्यजीव विभागाचे कर्मचारी पर्यटकाच्या सूचना व नियमावली बाबतीत कठोर भूमिका केव्हा घेणार? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
अकोले – काजवा महोत्सव काळात होणारा धांगडधिंगा रोखण्यासाठी वनविभागाने तयार केलेल्या नियमावलींची पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या पर्यटकाबरोबरच भंडारदरा परिसरातील काजवा महोत्सवाच्या नावाखाली होणारा धांगडधिंगा रोखण्यासाठी वनविभागाने पर्यटकांना केलेल्या सूचना व नियमावलीला पर्यटकांबरोबरच वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याने निसर्गप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे.
भंडारदरा, घाटघर, मुतखेल, पांजरे या निसर्गरम्य परिसरातील अभयारण्यात दरवर्षी काजवा महोत्सव असतो. मे व जून या महिन्याच्या कालावधीत काजवे दिसतात. दरवर्षी मान्सूनच्या आगमनापूर्वी रंगणारा काजव्यांचा लखलखाट पाहायला हजारो पर्यटक राज्यातून येतात. काजवा महोत्सवात झाडांच्या अतिशय जवळ जाणे, छायाचित्रणासाठी फ्लॅशचा वापर करणे, अभयारण्य परिसरात मद्याचा वापर करणे, वाहनातील स्पीकरवर गाणी लावून नाच गाण्याचा दंगा करणे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पर्यटकांना या भागात रात्री नऊ पर्यंत प्रवेश दिला जावा असे धोरण आहे.
तसेच काजवा महोत्सव दरम्यान आत गेलेल्या पर्यटकांना रात्री बाराच्या आत पुन्हा अभयारण्याबाहेर पडावे लागणे बंधनकारक आहे. रात्री बाराच्या नंतर अभयारण्य परिसरात पर्यटक दिसल्यास त्याच्याकडून प्रतिवाहन एक हजार रुपये दंड वसूल केला जातो. तसेच रात्री अभयारण्यात बाराच्या नंतर मुक्कामी असणाऱ्या पर्यटकाना नोंद करावी लागणे सक्ती आहे. वाद्य वाजवताना आढळल्यास वाद्य जप्त करून कारवाई करणे गृहीत धरले आहे. या परिसरात प्लास्टिक वस्तू फेकताना किंवा जागेवर ठेवून जाताना आढळून आल्यास एक हजार रुपये दंड केला जाणार आहे.
असे कडक नियमाचे पर्यटकांनी पालन करण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले होते.अभयारण्य परिसरात जाण्यास मुतखेल व शेंडी नाक्यावर वाहनांना रात्री नऊपर्यत प्रवेश होता. परंतू काजवा महोत्सवाच्या पहिल्याचं आठवड्यात भंडारदरा ते रतनवाडी रस्त्यावर काजवे पाहण्यासाठी जात असताना स्विप्ट गाडीचा पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याने चालक संकेत यंशवत जाधव यांचा मुत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले होते.
वन्यजीव विभागाचे नियमावली असताना पहाटेच्या सुमारास मुतखेल चेक नाका ओलाडुन ही गाडी कोणत्या वन्यजीव अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या परवानगीने अभयारण्यात गेली होती काय? याची मात्र अद्यापही चौकशी झाली नाही. तसेच वन्यजीव विभाग काजवे पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाकडून अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी मुतखेल व शेंडी नाक्यावर हालके वाहन 100 रुपये, जड वाहन 150 रूपये, स्कुटर -रिक्षा 25 रूपये असे वाहन शुल्क घेतले जात आहे. तर प्रौढ व्यक्ती 30 रूपये, लहान मुले 15 रूपये, कॅमेरा 100 रूपये प्रमाणे पर्यटन शुल्क घेतले जात आहे. यामुळे वन्यजीव विभागाला मोठ्या प्रमाणात पर्यटकाकडून महसूल मिळत असताना देखील वन्यजीव विभाग पर्यटकासाठी सोई- सुविधा उपलब्ध करण्यात अपयशी ठरत आहे. तसेच मुतखेल व शेंडी नाक्यावर रात्रीच्या सुमारास वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी बऱ्याचदा हजर राहताना दिसत नसल्याने काही पर्यटक अभयारण्यात प्रवेश करताना दिसतात. अनेकदा मुतखेल व शेंडी नाक्यावर तात्पुरते रोजदारीवर असलेले कर्मचारी काही पर्यटकाच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.