दाव्याच्या पुष्टीसाठी निवडणूक आयोगाला पुरावा सादर
नवी दिल्ली -कोलकत्यातील हिंसाचारावेळी भाजपच्या गुंडांनीच समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची नासधूस केल्याचा आरोपवजा दावा तृणमूल कॉंग्रेसने केला आहे. एवढेच नव्हे तर, दाव्याच्या पुष्टीसाठी पुरावा म्हणून तृणमूलने एक व्हिडीओही निवडणूक आयोगाला सादर केला.
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोवेळी मंगळवारी कोलकत्यात राडा झाला. भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने हिंसाचार झाला. त्यावेळी एका महाविद्यालयातील विद्यासागर यांच्या पुतळ्याची नासधूस करण्यात आली. त्यावरून राजकारण आणखीच तापले आहे.
अशात तृणमूलच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला एक व्हिडीओ सादर केला. त्यातून भाजपच्या गुंडांनीच पुतळ्याची नासधूस केल्याचे सिद्ध होत असल्याचा दावा तृणमूलकडून करण्यात आला. शहा यांच्या रोड शोसाठी भाजपने बाहेरून लोक आणले होते. झारखंड, उत्तरप्रदेश आणि बिहारमधून त्यांना आणले गेल्याचा आरोपही तृणमूलने केला. शहा खोटारडे आणि धोकेबाज असल्याचे व्हिडीओमुळे स्पष्ट होते, अशी भूमिका तृणमूलने घेतली आहे.