नैसर्गिक स्रोतांचे पुनरुज्जीवन : देहूगावातील तरुणांचा सामाजिक उपक्रम
मावळ, खेड, हवेली तालुक्यांना फायदा
श्री क्षेत्र देहूतील इंद्रायणी नदीतील तसेच कापूर ओढ्यातील राडारोडा आणि गाळ काढणे, नादुरूस्त बंधारा दुरूस्ती आणि नवीन बंधारा बांधकाम करण्याकडे पाटबंधारे, कृषी विभाग, जिल्हा परीषद, पंचायत समिती, प्रशासनाने त्वरीत लक्ष केंद्रीत केल्यास भरपूर पाणीसाठा होवून मावळ, खेड, हवेली अशा तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतजमिनी सुपीक करण्यास मदत होईल.
देहुरोड – नैसर्गिक स्रोतांचे पुनरुर्ज्जीवन व जलसंधारण आणि पुनर्भरणासाठी तीर्थक्षेत्र देहूगाव येथील तरुणांनी एकत्र येत कापूर ओढ्याचे खोलीकरणाचे काम हाती घेतले. लोकसहभागातून गेल्या दहा दिवसांपूर्वी प्रारंभ केले आहे. अद्यापपर्यंत सातशे मीटर लांबीच्या ओढ्यातून 350 ट्रॉली गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकला.
कापूर ओढ्याची लांबी सुमारे पाच कि.मी.पेक्षा जास्त असल्याची तर सुमारे एक कमी अंतरातील सात ते आठ फूट खोलीचा गाळ काढल्यानंतर कृषी विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या दोन बंधाऱ्याच्या खोली करणाच्या माध्यमातून 1 कोटी 82 लाख लीटर एवढा पाणीसाठा अतिरिक्त होईल.
श्रीक्षेत्र देहूगावाला सध्या कृत्रिम पाणी टंचाईने ग्रासले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करता येथील सुमारे 16 तरूणांनी एकत्र येत देहूगावचा कापूर ओढ्यावर जलसंधारण व जलपुर्नभरण कार्यक्रम हाती घेतला. यासाठी शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून 2007 साली चार बंधारे बांधण्यात आले. हे बंधारे बहुतांशी गाळाने भरलेले आहे. यापैकी दोन बंधाऱ्याचे खोलीकरणाचे काम हाती घेतले आहेत. यासाठी शासनाच्या एका राजपत्राचा आधार घेत जेथे गाळ साठलेला आहे, तेथे गौण खनिज उत्खननाची परवानगीची आवश्यकता लागत नाही. हा गाळ शेतकरी सुपीक माती म्हणून घेत आहे.
या उपक्रमाला शासकीय निधीची गरज आहे. मात्र हवेली तालुका हा दुष्काळग्रस्त नाही आणि गावाच्या बाजुने नदी वाहत असल्याने निधी उपलब्ध होत नसल्याची माहिती संतोष हगवणे यांनी दिली. सुहास काळोखे, प्रशांत मोरे, अमोल काळोखे, रवी काळोखे, रवींद्र मोरे, वसंत हगवणे, सागर हगवणे, संतोष हगवणे, प्रशांत शिवाजी काळोखे यांच्यासह सुमारे 16 तरूणांनी पुढाकार घेत स्ववर्गणी जमा करीत कामास प्रारंभ केले. त्यानंतर गावातील दानशूर व्यक्तीकडून देणगी स्वरूपात लोकवर्गणी मिळविली. त्यातून जेसीबी आणि ट्रॅक्टरचा खर्च भागविला जात आहे. यासाठी आतापर्यंत पन्नास ते पंच्चावन हजार रुपये खर्च आला आहे.
तरुणांनी सुरू केलेल्या या उपक्रमात परिसरातील जेसीबी व टॅक्टर मालकांनी नाममात्र शुल्कावर जेसीबी व ट्रॅक्टर उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले आहे. या ओढ्यातील गाळ काढण्यासाठी दोन जेसीबी व चार ट्रॅक्टर गेली दहा दिवसांपासून काम करीत आहेत. या बंधाऱ्यातून निघालेली माती ओढ्याकडेला असलेल्या शेतकऱ्यांच्या शेताला बंदिस्ती करून देत आहेत.