शिवारात सर्जा-राजाची ऐकू येणारी हाक मावळली
कोपर्डे हवेली – काही वर्षांपूर्वी शेती आणि शेतकरी म्हटल्यावर बैलांना सांभाळणाऱ्या शेतकऱ्याचे विशेष कौतुक होत असे. नवनवीन संशोधने व यांत्रिकीकरणाने शेतकरीही प्रगत झाला. पण परंपरागत शेतीतील सर्जा-राजाला दिलेली हाक, बैलगाडी, नांगर, कुळव आणि बरेच काही काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कालांतराने पिढ्या जसजशा होत जातील तसतसे हे सर्व पुस्तकात चित्रे आणि व्हॉट्स ऍपच्या संदेशापुरते मर्यादित राहतील, हेच चित्र सर्वत्र दिसत आहे.
शेतीतील उत्पन्नाव्यतिरिक्त उपलब्ध चारा पिकांवर जनावरांना जोपासणे सध्या जड जात असून बड्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर, छोटा ट्रॅक्टर, रोटर, हार्वेस्टर यासारख्या यंत्रांमुळे बैलांना पर्याय उपलब्ध झाला असला तरी अल्पभूधारक शेतकऱ्याला ही यंत्रणा परवडणारी नाही. जनावरांच्या वाढलेल्या किंमती व वैरण, खाद्य यांच्या किंमतीत भरमसाठ झालेली वाढ यामुळे ग्रामीण भागात जनावरांची संख्या घटली आहे. त्यातच बैलगाड्यांच्या शर्यतीही बंद झाल्याने शर्यतीवर जगणारा हौसी शेतकरी हतबल झाला आहे.