निवृत्तीवेतनात वाढ होणाच्या बातम्या हा निवडणुकीचा जुमला
नगर: केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय व त्यावर सुप्रीम कोर्टात झालेली याचिका व त्याबद्दल वृत्तपत्रात व माध्यमातून प्रसारीत झालेल्या बातम्यांचे खंडन करीत हा निवडणुकीचा जुमला असल्याचे पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष सुभाष पोखरकर यांनी सांगितले . जिल्ह्यातील ईपीएस 95 पेन्शनधारकांचा मेळावा श्रमिक भवन येथे महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे चिटणीस कॉ. आनंदराव वायकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडला. व भुलथापांना बळी न पडण्याचे पेन्शनधारकांना आवाहन केले. तर भुलथापा देणाऱ्या सत्ताधारी व त्यांच्या मित्रपक्षाच्या विरोधात मतदान करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
तर पोखरकर पुढे म्हणाले की, पाच ते सहा वर्षापासून गल्ली ते दिल्लीपर्यंत अनेक वेळा आंदोलने, उपोषण, मोर्चे काढूनही सरकारने पेन्शनधारकांच्या प्रश्नांकडे डोळेझाक केली. या सरकारने खोटी आश्वासने देवून फक्त फसवणुक केली आहे. 15 ते 25 हजार पेन्शन मिळणार हे बातम्या प्रसारित करण्या मागचा हेतू लोकसभेची निवडणुक आहे. सन 2015 नंतर सेवानिवृत्त झालेल्या पगाराचे सरासरीबाबत 60 महिन्यांऐवजी 12 महिन्यांचे पगाराची सरासरी धरावी एवढाच निर्णय झालेला असून, बाकी सर्व विषयांवर पुढील तारखेस सुनावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात कॉ.आनंदराव वायकर यांनी सरकारच्या भुलथापांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. केरळ उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. त्या याचिकेमध्ये कर्मचार्यांच्या 12 महिन्यांच्या पगारावरच सरासरी काढून पेन्शन कॅलक्युलेशन करण्याचे आदेश झाले. त्या आदेशाविरुद्ध ईपीएफओ कार्यालय व केंद्र सरकार यांनी 2 याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केल्या. त्या निकालाबाबत उहापोह केला.
तसेच 1 सप्टेंबर 2014 नंतर सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांची पेन्शनची मोजणी करतांना 5 वर्षाऐवजी 1 वर्षाच्या पगाराची सरासरी करुन पेन्शनमध्ये सुधारणा करणेबाबत संघटनेने सभासदांचे वैयक्तिक अर्ज रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर यांच्याकडे जमा केलेले आहेत. ज्या सभासदांनी हे अर्ज भरलेले नसतील त्यांनी आपले संघटनेच्या कार्यालयाकडे संपर्क साधून फॉर्म भरण्याचे आवाहन केले. तर फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क सभासदांनी देऊ नये. तसेच पेन्शन धारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ईपीएस 95 पेन्शनधारकांच्या वतीने लोकसभेसाठी स्वतंत्र्य उमेदवार उभे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकित रमेश गवळी, बलभिम कुबडे, टी.के. कांबळे, आशाबाई शिंदे, संपत समिंदर, नारायण होन, अशोक देशमुख, सुलेमान शेख, बाळासाहेब सोनवणे आदिंसह जिल्ह्यातील पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.