अकरा जणांचा मृत्यू; 14 जण बेपत्ता
मुंबई – कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण तूफानी पावसामुळे फुटले असून त्यातून आलेल्या पुरात अकरा जणांचा मृत्यू झाला असून अन्य 14 जण बेपत्ता आहेत. हे धरण फुटल्याने धरणाच्या खालच्या गावांना मोठा पुराचा फटका बसला आहे. स्थानिक पोलिसांनी सांगितले की या पुरात बेपत्ता झालेल्या अकरा जणांचे मृतदेह सापडले असून अन्य बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.पुरामुळे किमान सात गावे बाधित झाली आहेत. एनडीआरएफची पथके बोलावून बेपत्ता इसमांचा शोध घेतला जात असून गावकऱ्यांना अन्यत्र हलवले जात आहे. त्यामुळे आता तेथील स्थिती नियंत्रणाखाली आली आहे असे पोलिसांनी सांगितले.
शिवसेना आमदारच तिवरे धरणाचा ठेकेदार
तिवरे हे धरण दापोली लघु पाटंबधारे विभागाचे चिपळूण येथील छोटे धरण आहे. शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण हे या धरणाचे ठेकेदार आहेत. त्यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडवेट्टीवार यांनी केली. ते म्हणाले या प्रकरणातील निष्काळजीपणाबद्दल राज्य सरकारच्या विरोधातही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. धरण फुटल्यानंतर भेंडेवाडी, तिवरे, आकलेल, कादवड, नांदिवसे, दादर, गानेखडपोली या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संबंधात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की या प्रकरणात तक्रारी आल्यानंतर संबंधीत अधिकाऱ्यांना धरणाची दुरूस्ती करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनीही दुरूस्ती केल्याचे आम्हाला कळवले होते. परंतु आता या साऱ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.
या धरणाला तडे गेल्याची तक्रार सरकारकडे या आधीच करण्यात आली होती. पण त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांनी केला आहे. धरणाला तडे गेल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी लेखी स्वरूपात केली होती अशी माहितीही त्यांनी दिली. याची कबुली राज्याचे जलस्त्रोत मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.रत्नागिरी जिल्ह्यात गेले आठवडाभर तुफानी पाऊस पडत असून त्या भागातील अनेक नद्या नाले आणि ओढ्यांना पुर आला आहे.