महासंचालकांची भेट अन हद्दीत खून व अपहरण
पोलीस महासंचालक हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे, शिरूर, बारामती या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आयुक्तालयांना भेटी देत असतानाच दिघी पोलीस ठाणे हद्दीत एका व्यावसायिकाचे अपहरण झाले तर सांगवी पोलीस ठाणे हद्दीत एकाचा खून झाला. तर पुणे येथील नागरिकांनी गोळीबाराचा थरार अनुभवला. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची सुरक्षितता महासंचालकांसमोरच चव्हाट्यावर आली असे म्हणावे लागेल.
पिंपरी – उद्योगनगरीची “क्राईम सिटी’च्या दिशेने सुरू असलेली वाटचाल आता चिंतेचा विषय बनली आहे. सातत्याने गंभीर प्रकारचे गुन्हे वाढतच असल्याचे चित्र आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. जानेवारी ते एप्रिल 2019 या चार महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 5 हजार 391 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलीसआयुक्तआर.के.पद्मनाभन यांनी तक्रारी दाखल करुन दोष सिद्ध करण्यावर भर दिला आहे, मात्र दिवसें-दिवस वाढणारी गुन्हेगारीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. सातत्याने वाढणाऱ्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांना विशेष प्रयत्न करण्याची गरज सध्या दिसत आहे.
पुण्यात ज्याप्रमाणे बाहेरून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड येथे नोकरी, मजुरीसाठी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग येतो. त्यामुळे शहरात स्थलांतरित लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. भाड्याने राहणाऱ्या किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येकाची नोंदही पोलिसांकडे असेलच असे नाही. पोलिसांपुढे दिंवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या व त्यानुसार बदलणाऱ्या गुन्ह्यांची संख्या हे मोठे आव्हान ठरत आहे. हे प्रमाण पाहूनच आयुक्तालयाच्या निर्मीतीचा 2010 मध्ये प्रस्ताव मांडण्यात आला.
2018 साली पिंपरी-चिंचवड शहरास स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मिळाले. दरम्यानचे गेल्या पाच वर्षांचे आकडे पाहता गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. 2014 ते 2019 पर्यंतचा गुन्ह्यांचा आलेख वाढताच आहे. यामध्ये भाग एक ते पाच म्हणजेच मारामारी, खून, चोरी, फसवणूक, दरोडा, लूटमार अशा गुन्ह्याचा समावेश होतो. वर्षाकाठी असे पाच हजार गुन्हे आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल झाले आहेत. तर 2019 च्या चार महिन्यात ही आकडेवारी 1 हजार 724 एवढी वाढली आहे.