नवी दिल्ली: राफेल प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र साकारला मोठा झटका दिला आहे. राफेल प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. यामुळे ऐन निवडणुकीत भाजपच्या अडचणीत वाढ होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने राफेल पुनरावलोकनवर निर्णय जाहीर केला आहे.
दरम्यान, अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. आता कोर्टानेही सांगितलं चौकीदार चोर है, असे म्हणत राहुल गांधींनी पुन्हा पंतप्रधानांवर निशाणा साधला.
राफेल विमान खरेदी व्यवहार तपासणीची मागणी संदर्भातील निकालाबाबत फेरविचाराची मागणी करणाऱ्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. गेल्या वर्षी १४ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयाने राफेल व्यवहाराची तपासणी करण्याची मागणी फेटाळून लावली होती. राफेल करार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला क्लीन चिट दिल्यानंतर माजी मंत्री यशवंत सिन्हा व अरुण शौरी यांच्यासह प्रसिद्ध विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी याचिका केली होती.