वसुलीचा अजब फंडा : पालिकेच्या स्वच्छता अभियानास खो; संबंधितांवर कारवाई
कराड – शहरातील स्वच्छतेत सातत्य रहावे यासाठी नगरपालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. शहराचा कोपरा न कोपरा स्वच्छ व्हावा यासाठी कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी सर्वचजण एकजुटीने झटत असताना मंगळवारी एक अजब प्रकार शहरात घडला. व्यावसायिकाकडून जागेचे भाडे दिले जात नसल्याच्या कारणावरून चिडून जावून एका ट्रस्टने चक्क बांधकामाचा कचरा संबंधितांच्या जागेवर टाकला. या प्रकाराने पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानास खो बसल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित ट्रस्टवर तात्काळ कारवाई केली.
सदरची घटना नेहमीच लोकांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी घडल्याने या प्रकाराची शहरात दिवसभर चर्चा सुरू होती. संबंधित ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना कारवाई टाळण्याबाबत विनंती केली. मात्र ही बाब शहराच्या प्रतिष्ठेची मानत मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या सूचनेनुसार संबंधित ट्रस्टकडून पाच हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी, येथील प्रितीसंगम घाटावर कृष्णाबाई मंदिर परिसरामध्ये अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपले बस्तान मांडले आहे. सदरची जागा कृष्णाबाई मंदिर परिसरात मोडत असल्याने त्या जागेचे कृष्णाबाई मंदिर ट्रस्टकडून भाडे वसूल केले जाते. मात्र काही व्यावसायिकांनी या जागेचे भाडे दिले नसल्याच्या कारणावरून ट्रस्टच्या काही सदस्यांनी त्या जागेवर व्यावसायिक बसू नयेत म्हणून चक्क बांधकामाचा कचरा टाकला. या प्रकाराने व्यावसायिक व त्या परिसरात येणाऱ्या नागरिकांमधून एकच खळबळ उडाली.
कराड नगरपालिकने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात उत्तुंग भरारी मारली आहे. त्यात सातत्य ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. शहरातील सर्व गल्ली, कॉलनी, रस्ते, प्रितीसंगम बाग, घाट परिसर वेळच्यावेळी स्वच्छ करत असताना दुसरीकडे मात्र कृष्णाबाई मंदिर ट्रस्टने व्यावसायिक त्या जागेवर बसू नयेत म्हणून बांधकामाचा कचरा त्याठिकाणी टाकला ही बाब पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हा प्रकार सांगितल्यावर डांगे यांनी त्या ट्रस्टवर तात्काळ कारवाई करून रस्त्यावर कचरा टाकल्याप्रकरणी 5 हजार रूपयांचा दंड करण्याचे आदेश दिले.
मात्र ही बाब ट्रस्टच्या काही सदस्यांना कळाल्यावर त्यांनी तात्काळ डांगे यांची भेट घेवून पुन्हा असे कृत्य केले जाणार नाही असे सांगून कारवाई न करण्याची विनंती केली. व्यावसायिक दंड देत नाहीत म्हणून व्यावसायिकांना समज देणे अथवा त्याठिकाणी व्यवसाय करण्यास बसू न देणे असे पर्याय अवलंबविण्याऐवजी कचरा टाकल्याच्या या अजब प्रकारामुळे व्यावसायिकांबरोबरच नागरिक अवाक् झाले असून या प्रकाराची चांगलीच चर्चा झाली.