मुंबई:राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, दुष्काळी उपाययोजनांसाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली होती. दरम्यान, आयोगाने ही मागणी मान्य केली आहे.
राज्यात पडलेला दुष्काळ आणि त्यातच तापमानाच्या वाढत्या पा-यामुळे ग्रामीण भागात सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उन्हाच्या झळा वाढत चालल्याने पाण्यासाठी महिलांना मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक नागरिक स्थलांतरित होत असल्याने दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी अनेक कामे तातडीने पूर्ण करायची आहेत. मात्र, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडचणी येत होत्या.
त्यामुळे दुष्काळी भागातील उपाययोजनांसाठी राज्यातील निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली होती. दरम्यान, व्यापक लोकहिताचा विचार करून या मागणीस मान्यता दिल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.