सुरेश डुबल
चोरट्यांचा सुळसुळाट
अकरा कोटी रुपये खर्चून बांधलेल्या बस स्थानकाचा आवाका मोठा आहे. तसेच येथे चारी बाजूनी संरक्षण भिंत बांधणे गरजेचे आहे.ती न बांधल्यामुळे येथे चोरांचा सुळसुळाट पहावयास मिळत आहे. प्रवाशांचे दागिने तसेच मोबाईल चोरीत वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांनीही कोठेतरी एका ठिकाणी न उभे राहता बस स्थानक परिसरात गस्त घालने आवश्यक आहे.
कराड – पश्चिम महाराष्ट्रातील अद्यावत असलेल्या कराडच्या बस स्थानकाला सध्या ग्रहण लागले आहे. आगारप्रमुखांच्या दुर्लक्षामुळे बसस्थानकाला समस्यांनी ग्रासले आहे. त्यामुळे आगारप्रमुख तरी बदला, नाही तर बसस्थानकाकडे तरी लक्ष द्या, अशी मागणी प्रवाशांतून होऊ लागली आहे.
कोकण प्रवेशद्वार म्हणून कराडची ओळख आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांमधील दळणवळण वाढण्यासाठी कराड सारखे दुसरे ठिकाण नाही, हे ओळखून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षात कराडला बसस्थानकासाठी अकरा कोटी रुपये निधी दिला. बस स्थानकाला निर्मितीपासून साडेसाती सुरू झाली.ती आज तागायत तशीच आहे.
साडेतीन वर्ष पेक्षा जास्त काळ नवीन बस स्थानक सुरू होण्यासाठी गेला. यादरम्यान प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांनीही विकासात कधी अडचण न आणता मनस्ताप सहन केला. नवीन बसस्थानक झाल्यावर चांगल्या सोयीसुविधा मिळतील, या भरवशावर आबालवृद्धांसह विद्यार्थी विद्यार्थ्यांनी बस स्थानकात तारेवरची कसरत सुरू ठेवली होती. रडत-खडत या बसस्थानकाचे काम अखेर पूर्ण झाले. मात्र एवढ्या सुसज्ज बसस्थानकाच्या देखरेखीकडे लक्ष न दिल्याने या नवीन बसस्थानकाला सहा-सात महिन्यातच ग्रहण लागले आहे. बाकड्याची दुरावस्था, स्वच्छतागृहांची दुर्गंधी ,कचऱ्याची समस्या यांसह बऱ्याच अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे .एसटीच्या नावाने बोंबाबोंब आहे ती वेगळीच.
या सर्व अडचणींवर मार्ग काढून त्यावर ठामपणे निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याची सध्या वाणवा आहे.मलाच सगळं कळतंफ या अविर्भावात सध्या आगारप्रमुख पाटीलफकी गाजवताना दिसत आहे. मात्र त्यांनी पाटीलफकी च्या नादात बसस्थानकाकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. सायंकाळी खात्यातीलच चार-पाच जण बरोबर घ्यायची अन नुसत्या इकडून तिकडे चकरा मारायच्या, हा त्यांनी पायंडाच पाडला आहे. मात्र चकरा मारताना त्यांचे मोडलेली बाकडी, स्वच्छतागृहांची दुर्गंधी, बसस्थानक परिसरातील पडणारा कचरा याच्याकडे लक्ष जात नाही हे विशेष. त्यांच्या या मनमानी कारभारामुळे मध्यंतरी तर बसस्थानकातील कर्मचाऱ्यांनी या अधिकाऱ्याच्या विरोधात उपोषण करण्याचे योजिले होते. पण कुठे माशी शिंकली आणि हे आंदोलन होण्याआधीच बारगळले. तेंव्हा याची चर्चा शहरात दिवसभर सुरू होती.
कराडच्या या आधुनिक बसस्थानकात तब्बल एक हजार पाचशेच्या वर बसेस येतात व तेवढ्याच बाहेरही जातात. तालुक्यातील जवळजवळ दोनशे गावातून सुमारे 17 हजार विद्यार्थी कॉलेज व शाळेत ये-जा करण्यासाठी या बस स्थानकात येत असतात. एवढा मोठा आवाका असूनही येथे नेमलेले अधिकारी मात्र याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही .त्यामुळेच या नवीन बस स्थानकाला ग्रहण लागले आहे.
लोकप्रतिनिधींचे देखील याकडे म्हणावे तसे लक्ष नाही. काही दिवसांपूर्वी पालिकेचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी बस स्थानकात जाऊन पाहणी केली. तेथे असलेल्या अस्वच्छतेवरून त्यांनी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले होते. याव्यतिरिक्त तिकडे कोणीही लक्ष दिलेली नाही. या बसस्थानकाकडे लोकप्रतिनिधींनी देखील लक्ष देणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास कराडचे हे अद्यावत बस स्थानकाची ओळख हळूहळू पुसून हे समस्यांचे आगार बनल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित.