– अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेत मुख्यमंत्री व जयंत पाटलांची जुगलबंदी
मुंबई- मुख्यमंत्री म्हणून गेल्या पाच वर्षांत काम करताना अनेक अडचणी आल्या, आव्हाने निर्माण झाली. पण त्यापासून कधीच पळालो नाही. सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे आणि सकारात्मकपणे प्रश्न सोडवले. महाराष्ट्राचे वैभव परत आणण्यात यशस्वी ठरलो, असे सांगतानाच पुढच्या सरकारमध्येही मी पुन्हा येईल. याच निर्धाराने, याच भूमिकेत, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, असे काव्यात्मक पंक्तीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला निर्धार व्यक्त केला. तर जियेंगे तो और भी लढेंगे, असा टोला यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी लगावला.
अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी मंत्र्यांवर केलेले आरोप पेैटाळून लावत त्यांची पाठराखण केली. महिला व बालविकास मंत्रालयावर झालेल्या मोबाईल घोटाळ्याचा आरोपावर स्पष्टीकरण दिल्यानंतर जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या आरोपाला जोरदार उत्तर दिले. मागील चार-पाच वर्षांत मंत्री म्हणून चंद्रकांत दादांनी चांगले काम केले आहे. त्यांच्याकडे आलेला माणून निराश होऊन परत गेलेला नाही. एखादा निर्णय कुणाचाही चुकू शकतो. गेली 30-35 वर्षे त्यांना पाहतोय, पण दुर्भावनेने त्यांनी काही केलेले नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणून काम करताना पक्षाने तसेच राज्याच्या जनतेने जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,या काळात सर्वांना सोबत घेउन सर्वसमावेशकता आणायचा प्रामाणिक प्रयत्न केला.कोणताही प्रश्न असेल,आव्हान असेल त्याकडे सकारात्मकतेनेच पाहिले.अनेक अडचणी आल्या,पण त्यापासून पळालो नाही.15-20 वर्षांत न झालेल्या गोष्टी पूर्ण केल्या.विदर्भ-मराठवाडयाचा बॅकलॉग दूर करण्यात यशस्वी ठरलो.हे सोपे नव्हते याची कल्पना होती.पण राज्यातील 12 कोटी जनतेला दैवत मानून तिची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
… म्हणून पांडुरंगाचा आशिर्वाद लाभला
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवत,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मार्गावर चालत,शाहू महाराज,महात्मा फुलेंच्या विचारांचा वारसा घेउन,दीनदयालांच्या अंत्योदयाचा विचार घेउन,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यकारभाराचा आदर्श ठेवत पाच वर्षे काम केले.वारीत जसे आपण सहभागी होतो तसा या राज्यकारभाराच्या वारीत सहभागी झालो, यामुळेच जनतारूपी पांडुरंगाचा आशिर्वाद लाभला असे मुख्यमंत्री म्हणाले.
सत्य स्विकारले नाही तर तेथेच बसावे लागेल
अंतिम आठवडा प्रस्तावावर अनेकांनी ईव्हिएमचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. अजितदादांचं भाषण ऐकलं असतं तर जयंत पाटील, आव्हाडांनी हा मुद्दा मांडला नसता. अजितदादांनी पक्षाच्या शिबिरात सांगितलं की ईव्हीएमला दोष देऊ नका. त्यामध्ये काही नाही. ईव्हीएम 2004, 2009 मध्ये होते तेव्हाही मनमोहन सिंग निवडून आले. या आधी विधानसभा निवडणूकीत तीन राज्यांत कॉंग्रेस सरकार आले. एवढेच नव्हे तर आता सुप्रिया सुळेही निवडून आल्या. तुम्ही सत्य स्वीकारलं नाहीत तर तिथेच बसावं लागेल. आपण जनतेपासून दुरावलो. मोदींजींवर आरोप केले हे सत्य स्वीकारलं नाही तर तिथेच बसावं लागेल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
मतदार याद्या आधारशी लिंक करणार
ईव्हीएम हा सभागृहाचा विषय नाही ते निवडणूक आयोगाच्या अखत्यारित येतो, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. याआधी बॅलेट पेपरवर आरोप झाले आहेत. आम्ही त्याविरोधात सुप्रिम कोर्टात गेलो. तेव्हा हरलो. पण कधीतरी पराभव मान्य करावा लागतोच, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावर जितेंद्र आव्हाड यांनी मतदार याद्या आधारकार्डशी जोडल्यास बोगस याद्याचा घोळ होणार नाही, अशी सूचना केली. त्यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देताना मुख्यमंत्र्यांनी आपणही मागील पाच वर्षात बोगस याद्यांबाबत तक्रार करीत आहे. मतदार याद्या सुधारायला हव्यात. मतदार याद्या आधारकार्डला जोडण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जियेंगे तो और भी लढेंगे -जयंत पाटील
सभागृहात कोण येणार कोण नाही येणार याचे उत्तर शेवटी राज्यातील जनताच देणार आहे. महाराष्ट्रातील जनतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ती चांगल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर बसवू शकते आणि चांगला मुख्यमंत्री हुडकूही शकते. त्यामुळे जियेंगे तो और भी लडेंगे असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते जयंत पाटील यावेळी सत्ताधाछयांना लगावला.