सोलापूरमधील दुर्दैवी दुर्घटना ः घराच्या अंगणात खेळत असलेल्या दोघा चिमुरड्यांचा मृत्यू
सोलापूर – घराच्या बाहेर अंगणात खेळणाऱ्या दोघा चिमुरड्या भाऊ आणि बहिणीला पिकअपने चिरडल्याची दुर्घटना आज घडली आहे. दुधाचे पिकअप मागे घेत असताना दोन चिमुकल्यांचा गाडीच्या चाकाखाली चिरडुन मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना माढा तालुक्यातील मुंगशी गावात मंगळवारी सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास घडली.
आरवी तात्यासाहेब काळे (वय 3) आणि जय तात्यासाहेब काळे (वय दोन) अशी मृत्यु झालेल्या भावंडाची नावे आहेत. गावातील शेतकऱ्यांचे दुध घेऊन जाण्यासाठी मुंगशी गावात दररोज पिकअप येतो. आरवी व जय ही भावंडे घराच्या बाहेरील अंगणात खेळत होती. आई-वडिल घरात कामानिमित्त गुंतले होते. पिकअप मागे वळवत असताना चालकाने लक्ष न दिल्याने ही दोघेही चिमुरडी गाडीच्या मागच्या चाकाखाली चिरडली गेली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे काळे कुटुंबियांसह गावांवर दुःखाचा डोंगर कोसळला असुन गावात आक्रोश सुरु आहे. अपघातग्रस्त वाहनाच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपासु सुरु करण्यात आला आहे.