प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी
भुईंज – जो पर्यंत पिण्याचे पाणी आणि शेतीला पाणी मिळत नाही तो पर्यंत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय वेळे आणि चांदक येथील ग्रामस्थांनी घेतल्यानंतर खडबडूजन जागे झालेल्या प्रशासकीय विभागाने तातडीने दोन्ही गावांना भेट देवून ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या गंभीर प्रश्नाला ‘किरकोळ समस्या’ संबोधल्याने प्रांताधिकारी संगिता राजपुरे यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांनी केलेल्या वक्तव्याने सर्व ग्रामस्थ आक्रमक झाले होते.
वेळे पंचक्रोशी 2004 पासून दुष्काळाच्या छायेखाली वावरत आहे. दर 2-4 वर्षांनी दुष्काळी परिस्थितीमुळे आज शेतीला आणि पिण्याला पाणी मिळत नाही. यामुळे जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांचा दुधाचा जोड व्यवसाय ठप्प झाला असून जमिनी विकायला लागत आहे. वेळे गावात दर 4 दिवसांनी तर चांदक गावात दर 20 दिवसांनी पिण्यापूरते पाणी येत आहे. यामुळे पिण्याचे पाणी आणि शेतीला पाणी मिळत नाही तो पर्यंत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार कायम ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.
दीपक पवार, माजी सरपंच दशरथ पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार, अशोक ननावरे आदींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांपुढे आक्रमक भूमिका मांडली. ग्रामस्थांचे म्हणणे ऐकल्यावर अधिकाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच टॅंकरद्वारे पाणी देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगून बहिष्कार मागे घेत मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन केले. यावर ग्रामस्थांनी एकजुटीने हा निर्णय घेतला असून आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत सगळ्याच निवडणुकांवर सामूहिक बहिष्कार टाकणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट ही निष्फळ ठरली.