न्यू लॉ कॉलेज गेट ते नीलक्रांती चौका दरम्यान
महापौर बाबासाहेब वाकळे : कार्यारंभ आदेश देऊन तत्काळ कामास सुरुवात
नगर – नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी न्यू लॉ कॉलेज गेट ते निलक्रांती चौकापर्यत साचून राहिले होते त्यामुळे त्या भागातील वसाहतीमध्ये पाणी जमा झाले होते. याकरिता सदर भागाची पाहणी महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी केली. या भागात पावसाचे पाणी मोठया स्वरूपात वाहून येत असल्यामुळे पाण्याचा प्रवाह मोठा असतो. सदरचा रस्ता शहरात जाणारा मुख्य रस्ता आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या भागात पाणी साचून राहिल्यामुळे नागरिकांना जाण्या येण्यास त्रास होतो. याकरिता या भागाची पाहणी करून न्यू लॉ कॉलेज गेट ते निलक्रांती चौका पर्यत गटर साफ करण्याच्या कामास सुरूवात करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे तातडीने जेसीबी लावून कामास सुरूवात करण्यात आली.
यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, उपायुक्त प्रदिप पठारे, शहर अभियंता सोनटक्के, अभियंता बल्लाळ, श्री. इथापे, मुख्य स्वच्छता निरिक्षक श्री. अन्वर शेख नगरसेवक मा.श्री.दिप चव्हाण, मा.श्री. धनंजय जाधव, मा.श्री;अजय साळवे, कालिंदीताई केसकर, अजय चितळे, संजय ढोणे, गिरीष जाधव, सुनिल पारधे, पुष्कर कुलकर्णी , निलेश जाधव, अमोल वाकळे, शिवा आढाव, आदी उपस्थितीत होते.
महापौर म्हणाले, दिल्लीगेट ते न्यू आर्टस कॉलेज पर्यतचा रस्ता मा.मुख्यमंत्री साहेब यांच्या निधीमधून मंजूर असून त्यामध्ये साईड गटर देखील मंजूर आहे. त्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आलेला असून त्यापैकी गटारीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आतील वसाहतीमध्ये असलेल्या शौचालयाची पाहणी केली. याबाबत शौचालय तातडीने दुरूस्त करण्याच्या सुचना दिल्या. निलक्रांती चौक ते दिल्लीगेट ते सिना नदी पर्यत असलेल्या गटारीवरील चेंबर वरील जाळया साफ सफाई करून घेण्यात याव्यात. त्यामुळे पावसाचे पाणी त्या चेंबर मधून जाण्यास मदत होईल. तसेच दिल्लीगेट ते चौपाटी कारंजा रस्ता रूंदीकरणाबाबत पाहणी करण्यात आली.
यावेळी रस्तास बाधीत होणाऱ्या मालमत्ताधारकांना नोटीसा देवून पुढील योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या. पहिल्या टप्प्यामध्ये हा रस्ता रुंदीकरण झाल्यास या रस्त्यावरील बरीसची वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे यांनी सांगितले की, निलक्रांती चौक ते दिल्लीगेट ते नेप्तीनाका पर्यत असलेल्या गटारीवरील चेंबर पूर्णपणे झाकण्यात आलेल्या आहेत त्यामुळे पावसाचे पाणी वाहुन जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या गटारीवरील सर्व चेंबरची उंची वाढवून पाणी जाण्यासाठी जाळया बसविण्यात याव्यात अशा सूचना दिल्या.