नवी दिल्ली : हेरगिरी केल्याच्या आरोपावरून भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेचा पाकिस्तानने फेरविचार करावा, असा आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी दिला. यामुळे भारताचा मोठा विजय झाला व पाकिस्तानला झटका बसला. फेरविचार होईपर्यंत या शिक्षेला दिलेली स्थगिती कायम राहणार असल्याने कुलभूषण जाधव यांची फाशीही टळली. यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निकालाचे सर्व भारतीयांनी स्वागत करत जल्लोष केला.
दरम्यान, भारताने कुलभूषण जाधव यांची सुटका करण्याची तसेच त्यांना भारतात परत पाठवण्याची केलेली मागणी आंतरराष्ट्रीय न्यायलयाने फेटाळल्याचे सांगत पाकिस्तान सरकारने आपलाच विजय झाल्याचे ट्विट केले आहे. यावर भाजपाचे खासदार गिरीराज सिंह यांनी पाकिस्तानला ट्विटच्या माध्यमातून फटकारले आहे. या ट्विटला अनुसरुन गिरीराज यांनी एक मजेशीर ट्विट केले आहे. त्यांनी पाकिस्तानचे इंग्रजी खराब असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ‘यात तुमची चूक नाही. निकाल इंग्रजीत होता’.